
Bhendwal Ghatmandni 2026 : सुमारे 350 वर्षांची परंपरा असलेल्या बुलढाण्यातील भेंडवळ घटमांडणीमधून यंदाचे वर्षभराचे भाकित जाहीर करण्यात आले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडलेल्या या सोहळ्यात हजारो शेतकरी उपस्थित होते. सूर्योदयावेळी करण्यात आलेल्या निरीक्षणातून पाऊस, पिकांची स्थिती, देशाची आर्थिक आणि राजकीय परिस्थिती याबाबत अंदाज वर्तवण्यात आले.
यंदाच्या घटमांडणीतून काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. त्यानुसार पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरी यांचे उत्पादन चांगले राहील. ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी आणि इतर पिके सर्वसाधारण राहण्याचा अंदाज आहे. तसेच देशाच्या संरक्षण स्थितीत तणाव, आर्थिक स्थितीत अस्थिरता आणि काही भागांत महापुरामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
घटमांडणीतून मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्यात समाधानकारक पाऊस होईल, जुलैमध्ये पावसाची स्थिती सर्वसाधारण राहील, मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचा खंड पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे खरीप हंगामावर परिणाम होऊ शकतो.
भेंडवळमध्ये दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी घटमांडणी करून वर्षभराचा अंदाज वर्तवण्याची परंपरा आहे. ही परंपरा सुमारे 350 वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी सुरू केली. पर्जन्यमान, शेती, अर्थव्यवस्था आणि राजकारण यासंबंधी भाकिते या पद्धतीतून मांडली जातात.
परंपरेनुसार शेतात खड्डा करून त्यामध्ये मातीचा घट ठेवला जातो. त्यावर पाण्याने भरलेली घागर, विविध खाद्यपदार्थ आणि 18 प्रकारची धान्ये ठेवली जातात. रात्रीभर होणाऱ्या नैसर्गिक बदलांचे पहाटे निरीक्षण करून त्यावरून पावसाचा अंदाज, पिकांची स्थिती आणि देशाच्या परिस्थितीचे भाकीत केले जाते.
विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातून हजारो शेतकरी या घटमांडणीसाठी भेंडवळमध्ये येतात. या भाकितांच्या आधारे ते आपल्या पेरणीचे नियोजन करतात. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे ही परंपरा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरते.
भेंडवळ घटमांडणीला कोणताही शास्त्रीय आधार नसला, तरी शेतकऱ्यांमध्ये या परंपरेबद्दल प्रचंड विश्वास आहे. आधुनिक विज्ञानाच्या युगातही ही परंपरा टिकून आहे आणि आजही मोठ्या उत्साहात पार पडते.