
मुंबई : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा परिसरात अलीकडेच पर्यटक कुटुंबावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील एक आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.
रविवारी (१२ जुलै) भागवत कुटुंब भावली धबधबा परिसरात पर्यटनासाठी गेले होते. यावेळी काही तरुणांनी कुटुंबातील महिलेची छेडछाड केल्याचा आरोप आहे. महिलेने आणि तिच्या पतीने याबाबत जाब विचारला असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर परिसरातील काही जणही या वादात सहभागी झाले. या प्रकरणात पर्यटक कुटुंबाला मारहाण देखील करण्यात आली.
घटनास्थळावरून निघाल्यानंतरही आरोपींनी कुटुंबाचा पाठलाग सुरू ठेवला. जवळपास 15 किलोमीटर अंतरापर्यंत पाच ते सहा वेळा पर्यटक कुटुंबाची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गाडी न थांबल्याने आरोपींनी दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या. या वाहनात महिला, पुरुष आणि लहान मुलेही होती.
मार्गात अनेक ठिकाणी आरोपी पाठलाग करत असल्याने पीडित कुटुंबाने थेट नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाणे गाठले. तेथे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर शहर आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला.
या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र मुख्य आरोपी आकाश भोईरसह आणखी दोन आरोपी फरार आहेत. फरार आरोपींना कोणी आश्रय दिला आहे का, याचाही तपास सुरू आहे. याशिवाय या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश भोईर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. काही वर्षांपूर्वी माजी सैनिकाच्या हत्येप्रकरणी अकाश भोईरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. आता पुन्हा गंभीर गुन्ह्यात त्याचे नाव समोर आल्याने पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले आहे.