
Baramati By Election : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या असून, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले असून आता निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती पोटनिवडणुकीसाठी एकूण ५३ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी विलास होळकर, माऊली कांबळे, रझाक मुलाणी, राहुल थोरात, अमोल कोकरे आणि अशोक खामगळ या सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता ४७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात कायम आहेत.
९ एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने गुरुवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अंतिम मुदतीनंतर किती उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात राहतात आणि कोणामध्ये थेट लढत होणार, हे स्पष्ट होणार आहे.
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. काँग्रेसने उमेदवार माघारी घ्यावा यासाठी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्यात आला. मात्र काँग्रेसने अद्याप याबाबत कोणताही अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही.
बारामतीत काँग्रेसने उमेदवार देऊ नये, अशी भूमिका पक्षातील एका गटाची असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निवडणूक लढवणे हे राजकीय संकेतांना धरून नसल्याचे काही नेत्यांचे मत आहे. काही वरिष्ठ नेत्यांनी तर काँग्रेसने उमेदवार कायम ठेवला तर प्रचारात सहभागी होणार नसल्याची भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
आजच्या अंतिम मुदतीनंतर काँग्रेसचा उमेदवार माघार घेणार का, तसेच उर्वरित ४७ पैकी किती उमेदवार निवडणुकीत कायम राहणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे बारामतीतील ही निवडणूक अधिकच उत्कंठावर्धक बनली आहे.