
Ashok Kharat Nashik Godman Scandal Explained : नाशिकचा कथित भोंदू बाबा अशोक खरात उर्फ 'आबा' याच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाले आहेत. भविष्य सांगणं, न्यूमरॉलॉजी आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण करायचा, असं सांगितलं जातंय. खरातवर अनेक महिलांनी बलात्काराचे आरोप केले आहेत, पण एका महिलेसोबत तर त्याने अत्याचाराची हद्दच पार केली होती. सततच्या बलात्कारामुळे ती महिला गर्भवती राहिल्याचाही आरोप आहे.
ज्या महिलेच्या तक्रारीवरून अशोक खरातवर बलात्काराचा पहिला गुन्हा दाखल झाला, तिने सांगितलं की, गेल्या १० वर्षांपासून खरात तिच्यावर बलात्कार करत होता. या काळात ती महिला गर्भवतीही राहिली. पण, हे प्रकरण बाहेर येईल या भीतीने खरातने तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात घडवून आणला, असा गंभीर आरोप पीडितेने केला आहे.
सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की, इतक्या वर्षांपासून शोषण होत होतं, तर महिला गप्प का होत्या? यामागचं मुख्य कारण म्हणजे अशोक खरातचे कथित राजकीय आणि मोठे लागेबांधे. त्याने असं वातावरण तयार केलं होतं की, मोठे नेते, व्यावसायिक आणि प्रतिष्ठित लोक त्याच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पीडित महिला भीतीपोटी पुढे येऊन बोलायला घाबरत होत्या.
या प्रकरणात महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचंही नाव समोर आलं आहे. अशोक खरातसोबतचे त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यात त्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. कधी चाकणकर खरातचे पाय धुताना, तर कधी त्याच्यासाठी छत्री धरून उभ्या असलेल्या दिसल्या आहेत.
नाशिकच्या एका पत्रकाराने आरोप केला आहे की, जेव्हा त्याने खरातविरोधात बातमी प्रसिद्ध केली, तेव्हा रूपाली चाकणकर यांनी त्याला फोन करून बातमीचं खंडन छापण्यासाठी दबाव टाकला. 'त्या पीडितेला समोर आणा, म्हणजे बाबावर खोटे आरोप करणाऱ्या महिलेचा खरा चेहरा समोर येईल,' असंही चाकणकर म्हणाल्या होत्या. महिला आयोगासारख्या संस्थेशी संबंधित व्यक्तीच जर अशा आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असतील, तर पीडित महिलांना न्याय कुठे मिळणार? असा सवालही या पत्रकाराने उपस्थित केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकणकर या अशोक खरातच्या ट्रस्टशी संबंधित होत्या आणि ट्रस्ट बोर्डवरही त्यांचं नाव होतं. खरातला अटक झाल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता या प्रकरणात रुपाली यांच्या बहिणीचंही कनेक्शन समोर आलं आहे. रुपाली यांच्या बहिणीच्या नावावर अशोक खरातचं बँक खातं होतं, असंही बोललं जात आहे.
नाशिकच्या सिन्नर भागात राहणाऱ्या रामकृष्ण मदाने यांनीही आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले की, संतानप्राप्तीसाठी ते आपल्या पत्नीसोबत खरातकडे गेले होते. खरातने त्यांच्या पत्नीला एकटं ऑफिसमध्ये भेटायला बोलावलं. पण, त्यानंतर ते पुन्हा कधीच त्याच्याकडे गेले नाहीत. आता जेव्हा खरातचं खरं रूप समोर आलं, तेव्हा आपण त्याच्याशी पुढे संपर्क ठेवला नाही, हे आपलं नशीबच समजतो, असं ते म्हणाले.
अशोक खरातने लोकांच्या भीतीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेऊन गेल्या २० वर्षांत तब्बल १५०० कोटी रुपयांची संपत्ती जमवली असल्याचा आरोप आहे. आपल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी येणाऱ्या लोकांची फसवणूक करून त्याने ही संपत्ती उभी केली. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांच्या मते, ही संपत्ती १५०० कोटींपेक्षाही जास्त असू शकते.
या पैशातून खरातने नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात 'शिवनिका ट्रस्ट'ची स्थापना केली, शंकराचं मंदिर बांधलं आणि एक मोठं फार्महाऊस उभारलं. सुमारे १२ एकरात पसरलेल्या या फार्महाऊसमध्ये परदेशातून मागवलेलं महागडं फर्निचर आणि इतर सुविधा आहेत. त्याने इस्रायल आणि तुर्कीमधूनही सामान मागवून ऐषोरामी आयुष्य जगायला सुरुवात केली होती, असं सांगितलं जातं.