
Ajit Pawar Last Call : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. ‘कामाचा माणूस’ अशी ओळख असलेल्या अजित पवारांच्या अचानक जाण्याने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच आज बारामतीत त्यांच्या शेवटच्या फोन कॉलसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांनी अपघाताच्या सुमारे सहा मिनिटे आधी आपले चुलत पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांच्याशी फोनवर संवाद साधला होता. हा संवाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत होता. अजित पवार विमान प्रवासात असताना सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी त्यांनी श्रीजीत पवार यांना फोन केला होता.
श्रीजीत पवार, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी यांनी आज बारामतीतील राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार यांच्या शेवटच्या फोन कॉलचे रेकॉर्डिंग पत्रकारांना ऐकवण्यात आले. या कॉलमधून अजित पवार शेवटपर्यंत राजकीय कामात सक्रिय होते, हे स्पष्ट झाले.
श्रीजीत पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माळी समाजाच्या उमेदवाराला संधी देण्याची मागणी करत अजित पवार यांना टेक्स्ट मेसेज पाठवला होता. या मेसेजनंतर अजित पवारांनी फोन करून आतापर्यंत सर्व जाती-धर्मातील उमेदवारांना निवडणुकीत कशा प्रकारे संधी देण्यात आली आहे, याची माहिती दिली होती.