Abu Azmi : पालखी सोहळ्यामुळे वाहतूक ठप्प, पण नमाज पठणावरच आक्षेप?; अबू आजमींचा सवाल

Published : Jun 22, 2025, 03:47 PM ISTUpdated : Jun 22, 2025, 03:49 PM IST
Samajwadi MLA Abu Azmi (Photo credit, screengrab from video posted by @abuasimazmi)

सार

Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी पालखी सोहळ्यावर टीका केली आहे. रस्त्यावर नमाज पठणावरूनही त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. योगी आदित्यनाथ आणि नितेश राणे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.

सोलापूर: वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वारकऱ्यांचा पारंपरिक आणि श्रद्धेने भरलेला पालखी सोहळा महाराष्ट्रभर सुरू असताना, आजमी यांनी या सोहळ्यावर टीका करत वादाचे नवे पेव फोडले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना आजमी म्हणाले, "पालख्यांमुळे रस्ते जाम होतात. हिंदू धर्माचे अनेक सण रस्त्यांवर साजरे केले जातात, पण मुस्लिम समाजातील कुणीही त्याविरोधात तक्रार करत नाही. मग आम्ही जर केवळ दहा मिनिटं रस्त्यावर उभं राहून नमाज पठण केलं, तर त्यावरच आक्षेप का घेतला जातो?"

याच मुद्द्यावरून उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. "रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची धमकी दिली जाते. हा द्वेष आणि दुटप्पीपणा नाही का?" असा प्रश्न उपस्थित करत आजमी यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

यावेळी नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली. "महाराष्ट्रात मंत्री होणाऱ्या नेत्यांना दोन वेळा शपथ घ्यावी लागते, पण तरीही ते जातीवादाचं राजकारण करतात," असा आरोप करत आजमी यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

भाषिक प्रश्‍नांवर भाष्य करताना अबू आजमी म्हणाले, "महाराष्ट्रात मराठीला योग्य सन्मान मिळावा हे खरंच महत्त्वाचं आहे. मात्र, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकसंध हिंदी भाषा असणे गरजेचे आहे. मराठी, हिंदी आणि त्यानंतर इंग्रजी हे भाषिक सूत्र राज्यात असावे," अशी भूमिका त्यांनी मांडली.

याशिवाय, आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही त्यांनी मत व्यक्त केले. "इजरायल-इराण संघर्षात अमेरिका सरळ इजरायलच्या बाजूने उभी आहे. निष्पाप पॅलेस्टिनी बालकांचा बळी जात असताना अमेरिका गप्प का?" असा संतप्त सवाल आजमी यांनी उपस्थित केला. भारताने इराणला पाठिंबा द्यावा, अशी मागणी करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. "इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भारताने अनेक पॅलेस्टिनी नागरिकांना आश्रय दिला होता. आता त्या परंपरेचा सन्मान राखावा," असे ते म्हणाले.

आजमींच्या या विधानांमुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. एकीकडे पालखी सोहळ्याच्या निमित्ताने लाखो वारकरी भक्तीमय वातावरणात सहभागी होत आहेत, तर दुसरीकडे अशा वक्तव्यांमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

कुळाची जमीन खरेदीची किंमत कशी ठरते? जाणून घ्या कायदा नेमकं काय सांगतो
मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी 'डोकेदुखी'; सलग 3 दिवस सेवा ठप्प, 14 एक्स्प्रेस रद्द, अनेक गाड्यांना 'मेगा' विलंब!