
मुंबई : पाळी सुरू होण्याआधी महिलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. यालाच प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम (PMS) असं म्हणतात. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे हा त्रास होतो. याच काळात अनेकींना रात्रीच्या वेळी अचानक गोड खाण्याची तीव्र इच्छा होते.
तज्ज्ञ अंजली मुखर्जी सांगतात की, पीएमएसमुळे मूड स्विंग्स (अचानक मूड बदलणे), चिंता, नैराश्य, भूक वाढणे किंवा कमी होणे, बद्धकोष्ठता आणि झोपेच्या समस्या उद्भवू शकतात. हे सगळे त्रास आपल्या मासिक पाळीच्या चक्राशी जोडलेले आहेत, हे समजून घेणं ही पहिली पायरी आहे.
पीएमएसचा थेट परिणाम आपला मूड, भूक, झोप आणि पचनसंस्थेवर होतो. दर महिन्याला होणाऱ्या या बदलांमुळे चिडचिड करण्यापेक्षा, पाळीच्या आधी शरीरात आणि मनात नेमके काय बदल होतात हे समजून घेतलं पाहिजे. यामुळे या त्रासाचा सामना करणं सोपं जातं, असं अंजली सांगतात.
जर तुम्हाला पाळीच्या आधी खूप चिंता किंवा अँक्झायटी वाटत असेल, तर हा बदल तात्पुरता आहे आणि तो पाळीमुळे होत आहे, याची स्वतःला आठवण करून द्या. "हा माझा स्वभाव नाही, तर पाळीमुळे होणारा त्रास आहे," हे ओळखल्यास चिंतेवर मात करणं सोपं होतं. या काळात आहारातून पुरेसं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम घेतल्यास शरीराला ताकद मिळते आणि झोपही चांगली लागते.
शरीरात पाण्याची पातळी योग्य राखणं (हायड्रेशन) ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. भरपूर पाणी पिणे आणि मीठ असलेले सूप यांसारखे द्रव पदार्थ घेतल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते. मुखर्जी महिलांना वेळेवर आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला देतात. पीएमएसमुळे प्रत्येकीच्या भुकेवर वेगळा परिणाम होऊ शकतो. काहींना नेहमीपेक्षा जास्त भूक लागते, तर काहींना अजिबात जेवावंसं वाटत नाही, असंही अंजली सांगतात.