
Varuthini Ekadashi Vrat Story : हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप पवित्र मानलं जातं. प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांमध्ये (शुक्ल आणि कृष्ण) एकादशीचं व्रत केलं जातं. प्रत्येक एकादशीचं वेगळं नाव, महत्त्व आणि कथा धर्मग्रंथांमध्ये सांगितलेली आहे. याचपैकी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणतात. या एकादशीशी संबंधित एक रंजक कथाही आहे. व्रताचं पूर्ण फळ मिळवण्यासाठी ही कथा ऐकणं महत्त्वाचं मानलं जातं. चला, जाणून घेऊया वरुथिनी एकादशी व्रताची ही रंजक कथा…
फार पूर्वी मान्धाता नावाचे एक पराक्रमी राजे होते. त्यांच्या राज्यात सर्व प्रजा सुखी होती. म्हातारपणी त्यांनी आपला राजपाट सोडला आणि तपश्चर्या करण्यासाठी ते जंगलात निघून गेले. एक दिवस जेव्हा ते तपश्चर्येत लीन होते, तेव्हा अचानक एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. राजा मान्धाता तपस्येत मग्न असल्यामुळे काहीच करू शकत नव्हते.
अस्वल त्यांचा एक पाय पकडून त्यांना ओढत नेऊ लागलं, पण तरीही राजा मान्धाता यांनी आपली तपश्चर्या सोडली नाही आणि ते मनातल्या मनात भगवान विष्णूंचं स्मरण करत राहिले. जेव्हा अस्वल राजा मान्धाता यांना ठार मारणार होतं, त्याच वेळी तिथे भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी अस्वलापासून राजाचे प्राण वाचवले. हे पाहून राजा मान्धाता खूप आनंदी झाले.
राजा मान्धाता यांनी विचारलं, 'या जन्मात मी कोणतंही पाप केलं नाही, मग माझ्यासोबत असं का घडलं?' भगवान विष्णू म्हणाले, 'हे तुझ्या मागच्या जन्माचं फळ आहे. तू वैशाख महिन्यातील वरुथिनी एकादशीचं व्रत कर. असं केल्याने तुझ्या पूर्वजन्माची सर्व पापं नष्ट होतील आणि अस्वलाने खाल्लेला तुझा पायही तुला परत मिळेल.'
भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून राजा मान्धाता यांनी पूर्ण भक्तीभावाने वरुथिनी एकादशीचं व्रत केलं. त्याच्या प्रभावाने त्यांचा पाय पूर्णपणे बरा झाला आणि मृत्यूनंतर त्यांना स्वर्गात स्थान मिळालं. या कथेनुसार, जो कोणी वरुथिनी एकादशीचं व्रत करतो, त्याच्यावर भगवान विष्णूंची कृपा राहते आणि त्याला मोक्ष मिळतो.
Disclaimer
या लेखात दिलेली माहिती ही धर्मग्रंथ, अभ्यासक आणि ज्योतिषांकडून घेतलेली आहे. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत.