
मुंबई : महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. याच उत्साहात आता मराठी घरांमध्ये वेध लागलेत ते ज्येष्ठ गौरी पूजनाचे. २०२६ चं ज्येष्ठ गौरी पूजन आता अगदी जवळ आलंय. फुलांची सजावट, रांगोळी, आरास आणि गोडधोड नैवेद्य करत गौरींचं स्वागत करण्यासाठी सगळेच जण सज्ज झाले आहेत.हा तीन दिवसांचा उत्सव १७ सप्टेंबरला गौरी आवाहनाने सुरू होईल. त्यानंतर १८ सप्टेंबरला मुख्य ज्येष्ठ गौरी पूजन पार पडेल आणि १९ सप्टेंबरला गौरी विसर्जनाने या उत्सवाची सांगता होईल.
यंदा शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्य ज्येष्ठ गौरी पूजन साजरं केलं जाणार आहे.
पंचांग आणि प्रत्येक घराच्या परंपरेनुसार पूजेची नेमकी वेळ आणि मुहूर्त वेगवेगळ्या ठिकाणी थोडाफार बदलू शकतो.
पहिल्या दिवशी गौरी आवाहन असतं, म्हणजेच देवीचं घरात विधिवत आगमन होतं. यासाठी घर स्वच्छ करून छान सजवलं जातं. रांगोळी, फुलं, दिवे आणि पारंपरिक आरास करून पूजेची जागा तयार केली जाते.काही कुटुंबांमध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतीकात्मक टाक पूजेत ठेवले जातात, तर काही जण पारंपरिक मुखवटे वापरतात. अनेक घरांमध्ये ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन गौरी बसवण्याची प्रथा आहे, तर काही ठिकाणी देवीच्या एकाच रूपाची पूजा केली जाते.
दुसऱ्या दिवशी मुख्य पूजा असते. या दिवशी देवीला फुलं, हळद-कुंकू, अक्षता आणि फळं अर्पण केली जातात. त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती केली जाते.उत्सवाचा शेवटचा दिवस १९ सप्टेंबरला असेल. या दिवशी गौरी विसर्जन होतं आणि देवीला भावपूर्ण निरोप दिला जातो. विसर्जनाची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. काही जण देवीचे मुखवटे किंवा प्रतीकं पुढच्या वर्षासाठी जपून ठेवतात.
पूजेची अशी कोणतीही एकच ठरलेली पद्धत नाही, प्रत्येक घराची रीत वेगळी असते. पण साधारणपणे पूजेच्या जागेची स्वच्छता आणि सजावट करूनच या विधीला सुरुवात होते.यानंतर कलश आणि पूजेचं साहित्य मांडून गौरीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. मंत्रोच्चारात देवीचं आवाहन करून तिला फुलं, हळद-कुंकू, अक्षता, चंदन, धूप आणि दीप अर्पण केला जातो.सर्व विधी पूर्ण झाल्यावर गौरीला नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन गौरीची आरती गातात आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात.
गौरी पूजनामध्ये देवीला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याला खूप महत्त्व आहे. गौरीच्या नैवेद्यात पुरणपोळी, मोदक, खीर, भाताचे विविध प्रकार, भाज्या, फळं आणि नारळ यांसारख्या महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश असतो. अनेक घरांमध्ये या दिवशी भाज्यांचे विविध प्रकार करून खास बेत आखला जातो.
गौरी पूजनाचा गणेशोत्सवाशी खूप जवळचा संबंध आहे. अनेक पौराणिक कथांनुसार गौरीला गणपतीची आई मानलं जातं, तर काही ठिकाणी ती माता पार्वतीचा अवतार मानली जाते. हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर गौरीच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. सगळे मिळून पारंपरिक पदार्थ बनवतात आणि आपल्या पूर्वजांच्या चालीरीती पुढे नेतात. विविध विधी, चविष्ट नैवेद्य आणि पारंपरिक प्रथांमुळे महाराष्ट्रातील गणेशोत्सवात ज्येष्ठ गौरी पूजनाला एक वेगळंच आणि खास महत्त्व प्राप्त झालं आहे.