आपण सगळेच आयुष्यात कशाच्या ना कशाच्या मागे धावत असतो - यश, प्रसिद्धी, पैसा... पण या धावपळीत आपण हे विसरतो की काहीच कायम टिकणारं नाही. ही छोटीशी गोष्ट तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल.
एक साधू गावोगावी फिरून प्रवचन देत असत. एके रात्री एका तरुणाने त्यांना घरी बोलावून जेवण आणि राहण्याची सोय केली. साधू त्याच्या आदराने खुश झाले आणि त्याला श्रीमंत होण्याचा आशीर्वाद दिला. पण तो तरुण फक्त हसला आणि म्हणाला, 'स्वामी, पण संपत्ती कायम टिकणारी नसते, नाही का?' हे ऐकून साधू अवाक् झाले.
25
आयुष्य बदललं
दोन वर्षांनी साधू परत आले, तेव्हा त्या तरुणाचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. त्याची सगळी संपत्ती गेली होती आणि तो एका जमीनदाराकडे मजुरी करत होता. पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर हसू होतंच. तो शांतपणे म्हणाला, ‘स्वामी, तुम्ही दुःखी का? तुम्हीच तर शिकवलं की चांगल्या-वाईट दोन्ही काळात देवावर विश्वास ठेवा. ही परिस्थिती कायम राहणार नाही.’
35
मन: शांती महत्वाची
साधू आश्चर्यचकित झाले. त्या तरुणाने संपत्ती गमावली होती, पण मनःशांती नाही. तो नशिबाला दोष देत नव्हता. उलट, त्याने नवीन परिस्थिती स्वीकारली होती आणि आनंदात जगत होता. तो तरुण म्हणाला, 'आयुष्य आपल्याला सुख आणि दुःख दोन्ही देतं. अडचण तेव्हा होते, जेव्हा आपण यापैकी काहीतरी कायम टिकेल असं समजतो.' साधूंच्या लक्षात आलं की, आपण फक्त उपदेश करतो, पण हा तरुण ते सत्य जगतोय.
काही वर्षांनी साधू पुन्हा त्या गावात आले, तेव्हा त्यांना एक चांगली बातमी समजली. तो तरुण आता एक श्रीमंत वारसदार बनला होता! ज्या निपुत्रिक जमीनदाराकडे तो काम करायचा, त्याने तरुणाच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन आपली सगळी संपत्ती त्याच्या नावावर केली होती. पण प्रसिद्धी आणि पैसा त्याला बदलू शकले नाहीत. त्याने साधूंना सांगितलं, 'मी यातील काही संपत्ती दानधर्मासाठी वापरतो. यातच तिचं खरं मूल्य आहे.'
55
साधूंचा आशीर्वाद
साधूंनी त्याला 'सुखी भव' असा आशीर्वाद दिला. तरुण पुन्हा हसला. 'स्वामी, तुम्ही म्हणालात की संकट कायम राहत नाही. मग सुख तरी कसं कायम राहील? ही संपत्तीसुद्धा एक दिवस जाऊ शकते.' त्याने सांगितलं की तो सुख आणि दुःख दोन्ही समान भावाने स्वीकारतो. हे ऐकून साधूंनी त्याचे हात धरले आणि म्हणाले, 'मी फक्त उपदेश करतो, पण तू सत्य जगतो आहेस. खरा संन्यासी तर तू आहेस, जो कशातही न अडकता जगतोय.'