
मुंबई : भारतात टोमॅटोचे भाव कधी गगनाला भिडतात तर कधी एकदम खाली येतात, पण एक गोष्ट नक्की की आपल्या स्वयंपाकघरात टोमॅटो असतोच. पण तुम्ही रोज टोमॅटो खाता का? आणि असं रोज खाल्ल्यावर काय होतं? हेच शोधण्यासाठी काही संशोधकांनी एक स्टडी केली. यात ४२ लोकांनी तब्बल ९० दिवस रोज टोमॅटो खाल्ले. आणि याचा जो रिझल्ट समोर आला, तो खरंच आश्चर्यकारक आहे.
या स्टडीमध्ये ४० ते ५० वयोगटातील लोकांचा समावेश होता. खरंतर ४७ लोकांनी सुरुवात केली, पण ४२ जणांनी ९० दिवसांचा टप्पा पूर्ण केला. यानंतर असं दिसून आलं की, या लोकांचा मेंदू पूर्वीपेक्षा जास्त तेज आणि चपळ झाला होता. त्यांचं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता (focus) वाढली होती. मेंदूच्या कामाचा वेगही वाढला होता. इतकंच नाही, तर त्यांच्या स्मरणशक्त्तीतही थोडी वाढ झाली होती.
जुन्या घटना, नावं आठवण्याची त्यांची ताकद वाढली होती. ज्या ४२ लोकांनी टोमॅटोची पेस्ट खाल्ली, त्यांना कोणत्याही विषयावर जास्त चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता येत होतं. याचं कारण म्हणजे टोमॅटोमध्ये असलेलं 'लायकोपीन' (Lycopene) नावाचं एक महत्त्वाचं तत्व. हे तत्व शरीरातील रक्ताभिसरण आणि मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत करतं. तसंच सूज, वेदना आणि शरीराला हानी पोहोचवणाऱ्या घटकांशी लढतं. यामुळे मेंदूची ताकद, कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. टोमॅटो खाणं मेंदूसाठी किती फायदेशीर आहे, हे या स्टडीमधून स्पष्ट झालं आहे.
फक्त मेंदूच नाही, तर इतर आरोग्याच्या दृष्टीनेही टोमॅटो खाणं खूप चांगलं आहे. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम असे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराचं आरोग्यही सुधारतं. रक्तदाब नियंत्रणात राहतो, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती (immunity) वाढते, असंही या स्टडीत म्हटलं आहे. हा रिपोर्ट वाचल्यावर आता प्रत्येकाच्या जेवणात टोमॅटो नक्कीच सामील होईल.