
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जगभरात लाखो लोक क्रॉनिक किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. किडनी जेव्हा रक्तातून विषारी घटक गाळून बाहेर काढण्याची क्षमता गमावते, तेव्हा ही समस्या निर्माण होते. वेळेवर उपचार न केल्यास किडनी पूर्णपणे निकामी होऊ शकते.
मोठा धोका टाळण्यासाठी किडनीची समस्या वेळीच ओळखणं खूप गरजेचं आहे. कारण, किडनीचं मोठं नुकसान होईपर्यंत याची लक्षणं सहसा दिसून येत नाहीत. पण काही प्राथमिक लक्षणं ओळखून जीवनशैलीत बदल केल्यास किडनी निकामी होण्यापासून वाचवता येते. जाणून घेऊया अशी काही लक्षणं, जी तुम्ही अजिबात दुर्लक्षित करू नयेत.
किडनी निकामी होण्याचं पहिलं लक्षण म्हणजे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणं. किडनीचं काम बिघडल्यास शरीरात विषारी घटक साचू लागतात. यामुळे ॲनिमियाचा (रक्ताल्पता) त्रास सुरू होतो. रुग्णाला सतत थकवा आणि चक्कर येते, अगदी रोजची साधी कामं करणंही कठीण होऊन बसतं.
पाय, घोटे आणि हातांवर सूज येणं हे किडनी खराब होण्याचं एक प्रमुख लक्षण आहे. किडनीने नीट काम न केल्यास शरीरात अतिरिक्त पाणी साचायला सुरुवात होते. यामुळे शरीराच्या खालच्या भागात, विशेषतः पाय आणि घोट्यांमध्ये पाणी साचून सूज येते. अनेकदा चेहरा आणि हातांवरही ही सूज दिसून येते.
लघवीच्या सवयीत अचानक बदल झाल्यास सावध होणं गरजेचं आहे. वारंवार लघवीला लागणं (विशेषतः रात्री), लघवीचा रंग गडद होणं, फेस किंवा रक्त येणं ही किडनी निकामी होण्याची लक्षणं आहेत. तसेच भरपूर पाणी पिऊनही लघवीचं प्रमाण कमी होणं हा देखील धोक्याचा इशारा आहे.
सतत मळमळणं आणि उलट्या होणं हे किडनी निकामी होण्याचं लक्षण असू शकतं. रक्तात विषारी घटक साचल्यास मळमळ आणि भूक मंदावण्यासारख्या समस्या निर्माण होतात. यामुळे शरीराला पुरेसं पोषण आणि ऊर्जा मिळत नाही, परिणामी रुग्ण हळूहळू कमकुवत होत जातो.
श्वास घेण्यास त्रास होणं हे किडनी खराब होण्याचं आणखी एक मोठं लक्षण आहे. किडनी निकामी होऊ लागल्यास फुफ्फुसांमध्ये अतिरिक्त पाणी साचू लागतं. यामुळे थोडंसं काम केलं तरी रुग्णाची दमछाक होते. याशिवाय ॲनिमियामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊनही श्वासोच्छवासाचा त्रास वाढतो.
त्वचेला खूप जास्त खाज आणि कोरडेपणा जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. किडनी आपल्या रक्तातील विषारी घटक बाहेर काढण्याचं काम करते. पण किडनी निकामी झाल्यास शरीरात हे विषारी घटक साचू लागतात. यामुळे त्वचा अत्यंत कोरडी पडते आणि भयंकर खाज सुटून अस्वस्थता वाढते.
स्नायूंमध्ये पेटके येणं आणि अशक्तपणा जाणवणं हे किडनीच्या आजाराचं प्रमुख लक्षण आहे. किडनीची समस्या निर्माण झाल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडतं, विशेषतः पोटॅशियम आणि कॅल्शियमची पातळी कमी होते. यामुळे स्नायूंमध्ये भयंकर वेदना, पेटके आणि अशक्तपणा जाणवू लागतो.
रक्तात विषारी घटकांचं प्रमाण वाढल्यास त्याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यावर होतो. यामुळे रुग्णाची स्मरणशक्ती कमी होते, गोंधळ उडतो आणि कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करणं कठीण जातं. परिस्थिती गंभीर झाल्यास रुग्ण खूप जास्त झोपतो किंवा कोमातही जाऊ शकतो.
रक्तात अतिरिक्त विषारी घटक साचल्यास (युरेमिया) तोंडाची चव धातूसारखी (मेटॅलिक) होते. यामुळे तोंडाला दुर्गंधी येते आणि अनेकदा तोंडात फोडही येतात. या समस्येमुळे रुग्णाची जेवणाची इच्छा पूर्णपणे नाहीशी होते.
किडनी शरीरातील सोडियम आणि पाण्याचा समतोल राखून रक्तदाब नियंत्रित ठेवते. पण किडनीने नीट काम न केल्यास रक्तदाब अचानक वाढतो. आणि उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा धोकाही लक्षणीयरीत्या वाढतो.