
West Bengal Election Violence Murshidabad Bomb Attack: पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नाओदा परिसरात मतदानाच्या आदल्या रात्रीच सुतळी बॉम्ब फेकल्याने सगळा परिसर हादरला. या बॉम्बस्फोटात अनेक जण जखमी झाले असून, परिसरात तणावाचं वातावरण आहे. सकाळी आम जनता उन्नयन पार्टीचे (AJUP) प्रमुख हुमायूं कबीर घटनास्थळी पोहोचल्यावर वातावरण आणखीच तापलं.
हुमायूं कबीर यांनी घटनास्थळाला भेट दिली असता, तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यकर्त्यांसोबत त्यांची जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही गटांमध्ये घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाली. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, पण तणाव कायम होता.
दुसरीकडे, मालदा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा आला. यामुळे संतप्त मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्याला घेराव घालून जोरदार घोषणाबाजी केली. काही काळासाठी मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
या सर्व घटना घडत असतानाही, बंगाल आणि तामिळनाडूमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे, महिला मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याचं चित्र दिसलं.
चेन्नईमध्ये प्रसिद्ध अभिनेते अजित कुमार आणि TVK पक्षाचे प्रमुख विजय यांनी मतदान केलं. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी इतकी गर्दी केली की काही काळासाठी मतदान केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
बंगालमध्ये भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी "ममता बॅनर्जी जिंकण्याची कोणतीही शक्यता नाही," असा दावा करत राजकीय वातावरण तापवलं आहे. निवडणूक आयोग वेबकास्टिंगद्वारे सर्व बूथवर नजर ठेवून आहे.
पश्चिम बंगालमधील १५२ जागांवर आणि तामिळनाडूतील सर्व २३४ जागांवर मतदान सुरू आहे. बंगालमध्ये मुख्य लढत TMC आणि भाजपमध्ये आहे, तर तामिळनाडूमध्ये DMK आणि विरोधी आघाडीत जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, बंगालमधील उर्वरित १४२ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होईल. तर संपूर्ण निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. हिंसाचार, आरोप-प्रत्यारोप आणि उत्साही मतदानामुळे ही निवडणूक अत्यंत निर्णायक आणि तणावपूर्ण वळणावर पोहोचली आहे.