UPI Rules: सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) UPI पेमेंटसाठी एक नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. काय आहे हा नियम आणि त्यामुळे फसवणूक खरंच थांबेल का? जाणून घेऊया.
डिजिटल व्यवहारांचा वेग अनेकदा सायबर चोरांसाठी फायद्याचा ठरतो. UPI पेमेंट जितक्या वेगाने होतात, तितक्याच वेगाने सायबर गुन्हेगार लोकांची बँक खाती रिकामी करतात. PhonePe, Google Pay सारख्या ॲप्समुळे काही क्षणांत पैसे ट्रान्सफर होतात, पण एकदा गेलेले पैसे परत मिळवणे जवळपास अशक्य असते. याच गोष्टीचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार अनेकांना फसवतात. त्यामुळे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आता UPI व्यवहारांसाठी नवीन नियम आणत आहे. या नियमामुळे, फसवणूक झाल्यास पीडित व्यक्तीला 'गोल्डन अवर' (Golden Hour) मध्ये आपले पैसे परत मिळवण्याची संधी मिळू शकते.
25
काय आहे 'गोल्डन अवर' नियम?
आतापर्यंत UPI म्हणजे 'क्लिक-सेंड-डन' होतं, म्हणजेच एका क्लिकवर पैसे लगेच ट्रान्सफर व्हायचे. पण आता असं होणार नाही. काही UPI पेमेंटसाठी 'क्लिक-वेट-व्हेरिफाय-डन' हा नवा फॉर्म्युला लागू होऊ शकतो. याचा अर्थ, पैसे ट्रान्सफर व्हायला थोडा वेळ लागेल. जर तुम्हाला वाटलं की काहीतरी फसवणूक झाली आहे, तर तुम्ही लगेच अलर्ट होऊन व्यवहार थांबवू शकता. यापुढे ₹10,000 पेक्षा जास्त रक्कम UPI द्वारे पाठवल्यास त्याला एक तास लागू शकतो. हाच तो 'गोल्डन अवर' नियम आहे.
35
एक तासाचा वेळ का गरजेचा?
सायबर चोरांचं मुख्य शस्त्र म्हणजे वेग. ते लोकांना फसवून पैसे मिळवतात आणि तुम्ही सावध होण्याआधीच ते पैसे दहा वेगवेगळ्या खात्यांमध्ये फिरवतात. हेच टाळण्यासाठी 'गोल्डन अवर' नियम आणला जात आहे. हा 60 मिनिटांचा वेळ तुम्हाला सावध होण्यासाठी आणि फसवणूक झाल्यास व्यवहार थांबवण्यासाठी संधी देईल. चुकीने पैसे पाठवले किंवा फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास, त्या एका तासात व्यवहार थांबवता येईल.
1. नियमित व्यवहार: तुम्ही रोजचे रिचार्ज, वीज बिल किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना पैसे पाठवता, त्यावर या 'गोल्डन अवर' नियमाचा परिणाम होणार नाही. त्यामुळे तुमच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. 2. अनोळखी व्यवहार: जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला किंवा पहिल्यांदाच मोठी रक्कम (₹10,000 पेक्षा जास्त) पाठवाल, तेव्हाच हा 'होल्ड' कालावधी लागू होईल. 'अर्जंट आहे' असं सांगून फसवणाऱ्या चोरांसाठी हा नियम एक मोठा अडथळा ठरणार आहे.
55
सायबर गुन्हेगारीवर 'चेक मेट'
अनेकदा सायबर फसवणुकीचे बळी ठरलेल्या लोकांना खात्यातून पैसे कापल्यानंतर 15-20 मिनिटांनी आपली फसवणूक झाल्याचे कळते. RBI ने प्रस्तावित केलेला हा 'गोल्डन अवर' नियम पोलीस आणि बँकांना गुन्हेगारांचे नेटवर्क तोडण्यासाठी एक शक्तिशाली शस्त्र ठरू शकतो. सध्या हा नियम प्रायोगिक टप्प्यात असून, 8 मे पर्यंत यावर लोकांकडून मतं मागवण्यात आली आहेत. हा नियम पूर्णपणे लागू झाल्यास, 'डिजिटल इंडिया'मध्ये 'निर्धास्त व्यवहारांचं' एक नवं पर्व सुरू होईल!