
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याची चर्चा रंगली आहे. पक्षातील तब्बल 58 आमदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याचा दावा समोर आला असून त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
बंडखोर गटाने विधानसभा अध्यक्षांकडे पत्र सादर करून नवीन विधिमंडळ गटाच्या नेतृत्वासाठी रितब्रत बॅनर्जी यांचे नाव पुढे केल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोद पदांसाठीही स्वतंत्र नावे सुचवण्यात आल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसमध्ये बनावट स्वाक्षरी प्रकरण आणि पक्षांतर्गत मतभेदांमुळे तणाव वाढला होता. काही आमदारांनी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केल्याने हा वाद आणखी तीव्र झाला आणि अखेर त्याचे रूप उघड बंडात झाल्याचे दिसत आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र अपेक्षित संख्येने आमदार उपस्थित न राहिल्याने ही बैठक रद्द करावी लागली. या घटनेमुळे पक्षातील नाराजी अधिक स्पष्ट झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. फुटीची शक्यता लक्षात घेऊन तृणमूल काँग्रेसने काही संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. पक्षातील गटबाजी रोखण्यासाठी आणि संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
58 आमदारांचा दावा खरा ठरल्यास तृणमूल काँग्रेसच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होऊ शकतो. शिवसेनेप्रमाणेच बंगालमध्येही मोठ्या पक्षफुटीचे चित्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून पुढील काही दिवसांत या संघर्षाची दिशा स्पष्ट होणार आहे.