
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र मोदी यांनी वयाची 76 वर्षे पूर्ण केली असून आता राजकारणातून निवृत्ती घेऊन पुढील आयुष्य सामाजिक कार्यासाठी द्यावे, असे राऊत म्हणाले. देशाच्या नेतृत्वात बदलाची गरज असल्याचे सांगत देशाला तरुण नेतृत्वाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुजरात दौऱ्यावरही राऊत यांनी टीका केली. शिंदे यांचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह असल्याचा दावा करत त्यांच्या शिवसेनेचे मुख्यालय गुजरातमध्ये असल्याची टीका त्यांनी केली. वाढदिवसानिमित्त मोदी गुजरातमध्ये असल्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या आश्वासनावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी आतापर्यंत 760 आश्वासने दिल्याचा दावा राऊत यांनी केला आणि ती पूर्ण झाली नसल्यामुळे आंदोलन सुरू असल्याचे म्हटले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवून सरकारला तीन महिन्यांची मुदत दिल्याबाबत राऊत यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. जरांगे यांच्या प्रकृतीची चिंता असल्याचे सांगत आता जबाबदारी सरकारवर असल्याचे ते म्हणाले. मंत्र्यांनी आधी जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेल्याचा उल्लेख करत सरकार त्यांच्या बाबतीत दुटप्पीपणे वागत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.