
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा आर्थिक विकास, रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भरता यांना बळ देण्यासाठी सात प्रमुख क्षेत्रांची (Sapt Shakti) रूपरेषा सांगितली आहे. यामध्ये उत्पादन, कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नावीन्य, गति शक्ती, संरक्षण, हरित आणि सागरी अर्थव्यवस्था (Green and Blue Economy) आणि भारताची सॉफ्ट पॉवर यांचा समावेश आहे.
यामागचा मुख्य उद्देश हा आहे की, ही सर्व क्षेत्रं स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी एकमेकांना पूरक म्हणून काम करतील, तर भारताची उत्पादन क्षमता, रोजगार, निर्यात आणि जागतिक स्तरावरील स्पर्धात्मकता आणखी वाढू शकेल. पहिलं महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे उत्पादन आणि आत्मनिर्भरता. एखाद्या वस्तूच्या डिझाइनपासून ते सुटे भाग बनवण्यापर्यंत, शक्य तितकी संपूर्ण उत्पादन साखळी भारतातच तयार व्हावी, हा याचा उद्देश आहे.
भारतात बनवलेल्या वस्तू जागतिक दर्जाच्या असाव्यात आणि स्पर्धात्मक किमतीत उपलब्ध व्हाव्यात, यावरही भर दिला जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स, वाहनं, औषधं आणि संरक्षण उपकरणं यांसारख्या क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उत्पादन वाढवून आयातीवरील अवलंबित्व कमी करता येईल आणि भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळेल.
यानंतर कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राला महत्त्व दिलं आहे. शेतकऱ्यांनी फक्त पीक घेण्यावर न थांबता, त्यावर प्रक्रिया करून आणि मूल्य वाढवून ते जागतिक बाजारपेठेत विकावं, हा यामागचा उद्देश आहे. भरडधान्य, मसाले, फळं यांसारख्या वस्तूंसाठी शेतापासून ते निर्यात बाजारापर्यंत एक एकात्मिक पुरवठा साखळी तयार केली जाऊ शकते.
यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम टेक्नॉलॉजी, अंतराळ, रोबोटिक्स, डेटा सेंटर्स आणि नेक्स्ट-जनरेशन कम्युनिकेशन यांसारख्या क्षेत्रात भारताने नवनवीन शोध लावणारा देश बनायला हवं, असंही ध्येय ठेवण्यात आलं आहे.
चौथं क्षेत्र 'गति शक्ती' हे देशातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांना एकत्र जोडण्यावर लक्ष केंद्रित करतं. रस्ते, रेल्वे, बंदरं, विमानतळं, जलमार्ग आणि मालवाहतूक हे सगळं एकमेकांशी जोडलं गेलं, तर माल कमी खर्चात आणि वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येईल. यासोबतच संरक्षण क्षेत्रातही देशांतर्गत उत्पादन वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
ड्रोन, अँटी-ड्रोन टेक्नॉलॉजी आणि आधुनिक संरक्षण प्रणाली यांसारख्या क्षेत्रात भारताने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, हा यामागील उद्देश आहे. यामुळे देशाच्या संरक्षणाच्या गरजा तर पूर्ण होतीलच, पण नवीन तंत्रज्ञान आणि उद्योगांच्या संधीही निर्माण होतील. सहावं क्षेत्र म्हणून हरित आणि सागरी अर्थव्यवस्थेचा उल्लेख आहे.
ग्रीन हायड्रोजन, अपारंपरिक ऊर्जा, ऊर्जा साठवणूक, पर्यावरणपूरक वाहतूक आणि ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग यासोबतच सागरी संपत्तीचा वापरही आर्थिक विकासासाठी केला पाहिजे, हा यामागचा विचार आहे. यामध्ये किनारपट्टीवरील पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि सागरी तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. सातवं क्षेत्र म्हणजे भारताची 'सॉफ्ट पॉवर'.
योग, आयुर्वेद आणि भारतीय संस्कृतीने आधीच जागतिक स्तरावर देशाची ओळख मजबूत केली आहे. आता खेळ, चित्रपट, ॲनिमेशन, व्हिज्युअल टेक्नॉलॉजी आणि क्रिएटिव्ह क्षेत्रांमध्येही भारताचा प्रभाव वाढवण्याचं ध्येय आहे. अशा प्रकारे उत्पादन, तंत्रज्ञान, कृषी, संरक्षण, हरित विकास आणि सांस्कृतिक प्रभाव या सातही क्षेत्रांना एकत्र घेऊन पुढे गेल्यास भारताच्या दीर्घकालीन विकासाचा पाया आणखी मजबूत होऊ शकतो.