
बिहारमधून सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा (MLC) राजीनामा दिला आहे. इतकंच नाही, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही काल आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. आता हे दोन्ही नेते राज्यसभेतून आपल्या राजकीय कारकिर्दीचा नवा अध्याय सुरू करणार आहेत. बिहारमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. लवकरच नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचाही राजीनामा देणार असून, बिहारला नवे मुख्यमंत्री मिळतील, अशी चर्चा आहे.
नितीश कुमार यांनी फक्त २९ शब्दांत आपला राजीनामा पाठवला आहे. विजय चौधरी आणि आमदार संजय गांधी हे त्यांचं राजीनामा पत्र घेऊन विधान परिषदेत पोहोचले. दुसरीकडे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी रविवारी बिहार भाजपचे अध्यक्ष संजय सरावगी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. तो राजीनामा घेऊन सरावगी विधानसभेत पोहोचले आहेत. आता बिहारचे हे दोन्ही मोठे नेते वरिष्ठ सभागृहात, म्हणजेच राज्यसभेत दिसणार आहेत.
नितीश कुमार यांची १६ मार्च रोजी राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे ते लवकरच मुख्यमंत्रीपदाचाही राजीनामा देणार आहेत. यानंतर बिहारच्या भविष्यातील राजकारणावर पाटण्यापासून दिल्लीपर्यंत चर्चांना उधाण आलं आहे. कारण आता 'नितीश बाबू' केंद्राच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत. राज्यसभेत गेल्यानंतर नितीश कुमार अशा काही मोजक्या नेत्यांच्या यादीत सामील होतील, ज्यांनी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद या चारही सभागृहांमध्ये काम केलं आहे.