
आयुष्यात प्रत्येकाची एक वेगळी कहाणी असते. काही जण हरून जिंकतात, तर काही जिंकून हरतात. पण काही जण असेही असतात जे मृत्यूच्या दारातून परत येतात. 'officialhumansofbombay' या इन्स्टाग्राम पेजवर अशाच प्रेरणादायी कथा शेअर केल्या जातात. इथे तुम्हाला आयुष्यासाठी संघर्ष केलेल्या, जवळच्या माणसांकडून फसवणूक होऊनही पुन्हा उभ्या राहिलेल्या आणि खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिलेल्या कुटुंबांच्या कथा वाचायला मिळतील.
याच पेजवर कोमल जमवाल यांनी आपल्या आयुष्यातील चढ-उतारांची कहाणी शेअर केली आहे, जी आता व्हायरल झाली आहे. कोमल 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला सांगतात,
'वयाच्या 33 व्या वर्षी डॉक्टरांनी मला मृत घोषित केलं होतं, पण माझ्या पतीने हार मानली नाही. त्याने जे केलं त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आणि मला जगण्याची दुसरी संधी मिळाली.'
ही गोष्ट आहे मार्च 2012 मधली. मी एका कौटुंबिक कार्यक्रमातून परत आले होते आणि माझे पाय दुखायला लागले. मला वाटलं की थकव्यामुळे असेल, म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी माझा डावा पाय इतका जड झाला की तो उचलणंही कठीण झालं. मी काही वेदनाशामक गोळ्या घेतल्या. पण दोन दिवसांनी, सकाळी 6 वाजता उठून जमिनीवर पाय ठेवताच मी खाली कोसळले. माझ्या पायात अजिबात त्राण नव्हता. मी घाबरून रडू लागले. माझा नवरा धावत आला आणि त्याने कुटुंबाला एकत्र करून मला जम्मूमधील हॉस्पिटलमध्ये नेलं.
पाच दिवसांनी आणि अनेक तपासण्यांनंतर डॉक्टरांनी मला GBS (गुइलेन-बॅरे सिंड्रोम) झाल्याचं निदान केलं. पण खरा संघर्ष उपचारादरम्यान सुरू झाला. पुढच्या पाच दिवसांत मला पाच इंजेक्शन द्यायची होती, पण हॉस्पिटलच्या स्टाफने 24 तासांच्या आतच माझ्या नसांमध्ये सतत इंजेक्शन टोचली. माझं शरीर हा धक्का सहन करू शकलं नाही. मला एकापाठोपाठ एक हृदयविकाराचे झटके आले आणि डॉक्टरांनी मला मृत घोषित केलं. डॉक्टरांनी माझ्या कुटुंबाला सांगितलं की 'आता सगळं संपलंय, हिला घरी घेऊन जा'. पण माझ्या पतीने हे मानायला नकार दिला.
तब्बल 35 मिनिटं, तो वैद्यकीय तर्काच्या पलीकडे जाऊन हताशपणे मला CPR देत राहिला. अखेर माझ्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले. हॉस्पिटलमधील सगळेच जण थक्क झाले होते. मला तातडीने लुधियानाला हलवण्यात आलं आणि दहा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर खरं आव्हान सुरू झालं. मला पूर्णपणे बेड रेस्ट सांगितली होती. माझे पाय पूर्णपणे बधीर झाले होते. माझी मुलं फक्त 7 आणि 10 वर्षांची होती. त्यांच्या जेवणाचं, अभ्यासाचं काय होईल, या चिंतेत मी असायचे. पण माझं कुटुंब माझ्यामागे खंबीरपणे उभं राहिलं. मुलांनी मला ब्रश करायला मदत केली. माझ्या नवऱ्याने माझी काळजी घेण्यासाठी तीन महिन्यांची सुट्टी घेतली. माझी आंघोळ घालण्यापासून ते फिजिओथेरपीची व्यवस्था करण्यापर्यंत, त्याने सगळं केलं. जेव्हा माझे पाय निकामी झाले होते, तेव्हा माझं संपूर्ण कुटुंब माझे पाय बनलं होतं.
त्या घटनेला आता 14 वर्षे झाली आहेत. मी आता 47 वर्षांची आहे. अनेक वर्षांच्या उपचारानंतर, मी आता काठीशिवाय चालू शकते आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेऊ शकते. माझे पाय अजूनही थोडे कमजोर आहेत, पण ते मी लढलेल्या युद्धाची आठवण करून देतात. 'पहिल्यासारखं चालता येत नाही, याचं वाईट वाटतं का?' असं लोक विचारतात, तेव्हा मी हसते. एकेकाळी मला मृत घोषित केलं होतं, पण आज मी माझ्या मुलांना मोठं होताना पाहतेय. मला परिपूर्णतेची गरज नाही; माझ्याकडे एक असं आयुष्य आणि कुटुंब आहे, ज्यांनी कधीच माझी साथ सोडली नाही,' असं कोमल सांगतात. त्यांची ही कथा इंटरनेटवर खूप व्हायरल झाली असून, एका युझरने कमेंट केली आहे की, 'फक्त सावित्रीच नाही, तर सत्यवान सुद्धा असतो'. लोकांनी तिच्या पतीचं आणि कुटुंबाचं खूप कौतुक केलं आहे.
GBS म्हणजे गुइलेन-बॅरे सिंड्रोम, हा एक दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे. यात शरीराची रोगप्रतिकारशक्तीच नसांवर हल्ला करते. हे सहसा व्हायरल किंवा बॅक्टेरिअल इन्फेक्शननंतर होतं. यामुळे स्नायू कमजोर होतात आणि अर्धांगवायूचा धोकाही असतो.