Bengal: TMC नेत्याच्या अटकेची मागणी, आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने या भागात इंटरनेटसेवा बंद

West Bengal News: टीएमसी काँग्रेसचे नेते शेख शाजहान आणि त्यांच्या साथीदारांनी लैंगिक छळ करत जबरदस्तीने मोठ्या प्रमाणात जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे.

Harshada Shirsekar | Published : Feb 10, 2024 7:25 AM IST / Updated: Feb 10 2024, 01:23 PM IST

West Bengal News : तृणमूल काँग्रेसचे फरार नेते शेख शाजहान (TMC Leader Sheikh Shajahan) आणि त्यांच्या साथीदारांच्या अटकेच्या मागणीसाठी स्थानिकांकडून तीव्र स्वरुपात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनास हिंसक वळण प्राप्त झाल्याने पश्चिम बंगालमधील संदेशखळी भागामधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शुक्रवारपासून (9 फेब्रुवारी) सुरू असलेल्या या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे.

शाजहान (TMC Leader Sheikh Shajahan) यांच्या अटकेच्या मागणीसाठी स्थानिक महिलांच्या नेतृत्वामध्ये संदेशखळी परिसरामध्ये गेल्या तीन दिवसांपासून तीव्र स्वरुपात आंदोलन सुरू आहे. दरम्यान कथित रेशन घोटाळ्यामध्ये शाजहान यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकावर जमावाने हल्ला केल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या शाजहानच्या अटकेची मागणी आता जोर धरू लागली आहे.

शेख शाजहान यांच्यावर गंभीर आरोप 

शाजहान (TMC Leader Sheikh Shajahan) आणि त्यांच्या साथीदाराने लैंगिक छळ करण्यासोबतच जबरदस्तीने मोठ्या प्रमाणामध्ये जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप या आंदोलनकर्त्यां महिलांनी केला आहे.

आंदोलनकर्ते झाले आहेत आक्रमक

हातामध्ये लाठ्याकाठ्या आणि झाडू घेऊन स्थानिक महिलांनी संदेशखळीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोर्चा काढल्याने दुसऱ्या दिवशी देखील आंदोलनाची तीव्रता वाढली. शुक्रवारी (9 फेब्रुवारी) दुपारी शाजहानचे (TMC Leader Sheikh Shajahan) सहकारी शिबोप्रसाद हाजराच्या घराची देखील तोडफोड करण्यात आली. 

यानंतर येथील फर्निचर जाळण्यात आले. हाजरा येथील झेलियाखली येथील एका पोल्ट्री फार्मला देखील आग लावण्यात आली. शाजहान आणि त्यांच्या साथीदारांनी बळकावलेल्या जमिनीवर शेततळे बांधण्यात आले असून येथे त्यांना काम करण्यास भाग पाडले जात असल्याचाही आरोप आंदोलकांनी केला.

आठ जण ताब्यात

परिसरामध्ये तोडफोड केल्या प्रकरणी आठ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती डीआयजी (Barasat range) सुमित कुमार यांनी दिली आहे. तर दुसरीकडे स्थानिकांनी कायदा हाती घेऊ नये, असे आवाहन अतिरिक्त महासंचालक (Law and Order) मनोज वर्मा (Manoj Verma) यांनी केले आहे.

“दाखल झालेल्या सर्व तक्रारींची चौकशी सुरू असून कारवाई केली जाईल. तसेच कोणी कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही कायद्याने कारवाई केली जाईल. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे,” अशीही माहिती त्यांनी दिली.

आंदोलनकर्त्या महिलांनी संदेशखळी पोलीस स्टेशनबाहेर काही तास ठिय्या आंदोलनही केले. शनिवारी पुन्हा आंदोलन करणार असे सांगून शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांनी निदर्शने मागे घेतली.

आणखी वाचा

काँग्रेसने देशाचा विकास मंदावला, आम्ही विक्रमी वेगाने केले काम - PM नरेंद्र मोदी

Mithun Chakraborty : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

White Paper : 'UPAने 10 वर्षात अर्थव्यवस्थेची केली दुरवस्था', मोदी सरकारकडून श्वेतपत्रिका सादर

Share this article