
मुंबई : इराणमधील युद्ध, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिकेच्या निर्बंधांसारखी मोठी आव्हानं असतानाही, भारतीय अर्थव्यवस्थेने (GDP Growth in India) दमदार कामगिरी केली आहे. इतकंच नाही, तर अपेक्षेपेक्षाही चांगली कामगिरी करून दाखवली आहे. केंद्र सरकारने सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाची (GDP) आकडेवारी जाहीर केली. यानुसार, चालू आर्थिक वर्ष २०२६-’२७ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) देशाचा GDP ७.८% दराने वाढला आहे. हा आकडा ७.१% च्या अंदाजापेक्षा खूपच जास्त आहे. हे मोदी सरकारसाठी एक मोठं यश मानलं जात आहे (India Economic Growth).
गेल्या वर्षी याच तिमाहीत (जून तिमाही) GDP वाढीचा दर फक्त ६.९% होता. म्हणजेच, यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. सरकारच्या भांडवली खर्चात वाढ, वस्तू उत्पादन आणि निर्यातीवरही याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. २०२५-’२६ आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) सुद्धा GDP दर ७.८% होता. त्यानंतरच्या तीन महिन्यांतही तोच आकडा कायम राहील, अशी अनेकांना अपेक्षा नव्हती. कारण २८ फेब्रुवारीला इराण युद्ध सुरू झाल्यामुळे भारताचा GDP कमी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. या संघर्षांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या.
केंद्र सरकारच्या अंदाजानुसार, २०२५-’२६ या आर्थिक वर्षात देशाची वास्तविक GDP वाढ ७.७% झाली आहे. आर्थिक विश्लेषकांच्या मते, भू-राजकीय अस्थिरतेच्या काळातही भारताची देशांतर्गत मागणी मजबूत राहिली. त्यामुळेच देशाच्या GDP ने ही चमकदार कामगिरी केली आहे. सोमवारी GDP चे आकडे समोर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' हँडलवर एक पोस्ट केली. त्यांनी म्हटले, ‘‘सर्व अंदाज चुकीचे ठरले आहेत. भारत पुन्हा एकदा विकसित झाला आहे.’’