
India Begins Digital Census 2027 : देशातील जनगणना प्रक्रियेला उद्या, म्हणजेच १ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे, ही देशातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे. हे काम दोन टप्प्यांत पार पडेल. पहिल्या टप्प्यात घरांची माहिती गोळा केली जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची मोजणी होईल. २०११ नंतर होणारी ही जनगणना कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती, आता ती पुन्हा सुरू होत आहे.
पहिल्या टप्प्यात घरांची मोजणी (Housing Census) केली जाईल. यामध्ये घराचा प्रकार, घरात उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा आणि मालमत्तेची माहिती गोळा केली जाईल. या माहितीमुळे प्रत्येक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि राहणीमान समजण्यास मदत होईल. त्यानंतर, फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात लोकांची वैयक्तिक माहिती, जात आणि इतर तपशील गोळा करून लोकसंख्या मोजली जाईल. यावेळी माहिती गोळा करण्यासाठी मोबाईल ॲप आणि विशेष वेब पोर्टलचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे माहिती जलद आणि अचूकपणे मिळेल.
केरळमध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला जून महिन्यात सुरुवात होईल. तिथे १६ ते ३० जून दरम्यान लोकांना 'सेल्फ एन्युमरेशन' म्हणजेच स्वतःहून माहिती भरण्याची सोय उपलब्ध असेल. त्यानंतर १ जुलै ते ३० जुलैपर्यंत जनगणनेचे कर्मचारी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील. देशभरातून गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून १ मार्च २०२७ पर्यंत जनगणनेची नवीन आकडेवारी अधिकृतपणे जाहीर करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.