
Bharat Bandh : केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांकडून आज (12 फेब्रुवारी 2026) देशव्यापी भारत बंदची (Bharat Bandh 12 Feb 2026) हाक देण्यात आली आहे. देशभरातील विविध संघटनांचे अंदाजे 30 कोटी कामगार या संपात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सरकारी कार्यालये, बाजारपेठा आणि काही वाहतूक सेवांवर परिणाम होऊ शकतो.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी 29 कामगार कायद्यांच्या जागी चार नवीन कामगार संहिता लागू केल्या. या नव्या संहितांविरोधात कामगार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत देशव्यापी बंदची घोषणा केली आहे.
याशिवाय, खासगीकरणाचा विरोध, वीज दुरुस्ती विधेयक, बियाणे विधेयकाचा मसुदा आणि ‘पीस’ कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनरेगा योजना पुनर्संचयित करण्याची मागणीही संघटनांनी लावून धरली आहे.
संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभा यांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. तसेच ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनसह प्रमुख बँक संघटनांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.