
Air India : मध्य पूर्वेतील तणाव, काही हवाई मार्गांवरील बंदी आणि विमानाचं इंधन (जेट फ्युएल) महागल्यामुळे एअर इंडियाने आपल्या आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, येत्या जुलै महिन्यापर्यंत हे निर्बंध कायम राहतील. जे मार्ग फायद्यात नाहीत, त्या मार्गांवरील फ्लाईट्स कंपनी रद्द करत आहे.
विल्सन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका मेसेजमध्ये स्पष्ट केलंय की, सध्याच्या परिस्थितीत बहुतेक आंतरराष्ट्रीय उड्डाणं मोठ्या तोट्यात चालली आहेत. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानांना लांबच्या मार्गाने वळसा घालून जावं लागतंय. यामुळे इंधनाचा वापर वाढला असून कंपनीचा खर्चही प्रचंड वाढला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात काही फ्लाईट्स आधीच कमी केल्या होत्या. पण परिस्थितीत सुधारणा न झाल्याने एअर इंडियाला आता जून आणि जुलै महिन्याच्या वेळापत्रकातही बदल करावा लागत आहे.
प्रवाशांच्या प्रवासाच्या नियोजनात आणि कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळापत्रकात होणाऱ्या बदलांबद्दल विल्सन यांनी दिलगिरी व्यक्त केली. 'जेव्हा होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होईल आणि मध्य पूर्वेतील तणाव संपेल, तेव्हाच विमानसेवा पूर्वीसारखी सामान्य होईल,' असंही त्यांनी स्पष्ट केलं. एका अंदाजानुसार, 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एअर इंडिया ग्रुपला तब्बल 22,000 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या मोठ्या आर्थिक संकटात, हवाई मार्गांमधील अडथळे हे एअर इंडियासमोर एक मोठं आव्हान बनलं आहे.