
अभिनेता सोनू सूद यांनी त्यांच्या घरी गणपती बाप्पाच्या आगमनाची परंपरा कशी सुरू झाली याबद्दल सांगितले. मुंबईत पहिल्यांदा आल्यानंतर बाप्पाला घरी आणण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि आज त्या परंपरेला 26 वर्षे पूर्ण होऊन 27वे वर्ष सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. आयुष्यात आपण जे काही मिळवू शकलो, ते बाप्पाच्या आशीर्वादामुळे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दुसऱ्यांचा विचार करायला सुरुवात केल्यावर आपले कुटुंब मोठे होते, असे सोनू सूद म्हणाले. विघ्नहर्ता गणपतीकडून इतरांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची शिकवण मिळते आणि त्यासाठी अभिनेता, श्रीमंत किंवा प्रभावशाली असण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना गरज असताना आपली इतर कामे बाजूला ठेवून त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे कर्तव्य असल्याचेही सोनू सूद म्हणाले. आपल्या चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत येणारे वर्ष आनंदाचे जावो, सर्वांची स्वप्ने पूर्ण होवोत आणि लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणत राहा, असा संदेश त्यांनी दिला.