
मुंबई : भारतीय सिनेसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन झालं आहे. बी.आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' मालिकेत अश्वत्थामाची भूमिका साकारून ते घराघरात पोहोचले होते. मंगळवारी (४ ऑगस्ट) वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
'लगान', 'गजिनी' आणि अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये आपल्या प्रभावी खलनायकी भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रदीप रावत यांनी अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावरून दिली.
अभिनेते यशपाल शर्मा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत प्रदीप रावत यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिलं,
"प्रदीप रावत... आमचे गजिनी, 'लगान'चे देवा, तुम्हाला विनम्र श्रद्धांजली."
यशपाल शर्मा यांच्या या पोस्टनंतर चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये दुःखाचं वातावरण आहे. मात्र, ही बातमी लिहिपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांकडून निधनाच्या कारणाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये जन्मलेल्या प्रदीप रावत यांचा अभिनयाचा प्रवास संघर्षांनी भरलेला होता. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेकदा अपयश आणि रिजेक्शनचा सामना करावा लागला.
त्यांचं दमदार व्यक्तिमत्त्व आणि स्क्रीन प्रेझेन्सवर प्रसिद्ध चित्रपट निर्माते बी.आर. चोप्रा यांची नजर पडली. त्यानंतर त्यांना 'महाभारत' या ऐतिहासिक मालिकेत अश्वत्थामाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ही भूमिका इतकी गाजली की प्रदीप रावत एका रात्रीत घराघरात ओळखले जाऊ लागले. हाच त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला.
टीव्हीवर यश मिळवल्यानंतर प्रदीप रावत यांनी बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्येही आपली वेगळी छाप सोडली. 'लगान' सिनेमात त्यांनी साकारलेली देवा सिंग सोढीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
त्यानंतर आमिर खानच्या सुपरहिट 'गजिनी' सिनेमातील त्यांची खलनायकाची भूमिका खूप गाजली. त्यांनी हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम सिनेमांमध्येही अनेक दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली.
प्रदीप रावत अशा कलाकारांपैकी होते, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या, संवादफेकीच्या आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्सच्या जोरावर प्रत्येक भूमिकेला अविस्मरणीय बनवलं. मग ती ऐतिहासिक मालिका असो, बॉलिवूडचा सुपरहिट सिनेमा किंवा दाक्षिणात्य चित्रपट, त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला.
त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीने एक असा अभिनेता गमावला आहे, ज्याच्या अनेक भूमिका येणारी अनेक वर्षं प्रेक्षकांच्या आठवणीत जिवंत राहतील.