
बंगळुरु : कन्नड सिनेसृष्टीत अभिनेता यशसोबत 'मास्टरपीस', रक्षित शेट्टीसोबत 'अवने श्रीमन्नारायण' आणि दर्शनसोबत 'तारक' यांसारख्या सिनेमांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शान्वी श्रीवास्तव. गेल्या १२ वर्षांपासून ती सिनेसृष्टीत काम करत असून, आता बंगळुरु हेच तिचं दुसरं घर झालं आहे. लवकरच ती 'अमेरिका अमेरिका २' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शान्वी मूळची उत्तर प्रदेशातील वाराणसीची आहे, पण तिचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं आहे. नुकतंच 'बंगळुरू टाइम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत, तिने महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत बंगळुरुपेक्षा मुंबई जास्त सुरक्षित वाटत असल्याचं स्पष्ट मत मांडलं आहे.
आपल्या शहराबद्दल बोलताना शान्वी म्हणाली, "माझं बालपण वाराणसीच्या गल्ल्या, मंदिरं आणि तिथल्या लोकांमध्ये गेलं. गेल्या महिन्यातच मी तिथे आठवडाभर राहून आले. वाराणसी हे माझं खरं घर आहे, पण कुटुंब मुंबईत असल्यामुळे मी तिथे राहते. मुंबई मला जे स्वातंत्र्य देते, ते मला खूप आवडतं. तिथे प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो, त्यामुळे कोणी तुम्हाला जज करत नाही. मुंबईत मध्यरात्रीसुद्धा बिनधास्त बाहेर फिरता येतं. पण बंगळुरुमध्ये मला तितकी सुरक्षितता जाणवत नाही."
यामागचं कारण सांगताना ती पुढे म्हणाली, "मी एक अभिनेत्री आहे म्हणून ओळखली जाते, यापेक्षाही मी एक 'स्त्री' आहे हे यामागे महत्त्वाचं कारण आहे. मास्क घालून बाहेर पडले तरी मुंबई इतकं सेफ बंगळुरूमध्ये वाटत नाही," असं तिने मोकळेपणाने सांगितलं.
सुरक्षेच्या बाबतीत मुंबई तिला जास्त जवळची वाटत असली तरी, 'गार्डन सिटी' बंगळुरुबद्दलचं तिचं प्रेम कमी झालेलं नाही. ती म्हणाली, "मी महिन्यातले किमान १५ दिवस बंगळुरूमध्येच असते. इथली ट्रॅफिक सोडली, तर बाकी सगळंच मला आवडतं - इथलं जेवण, हवामान आणि माणसं. मी माझ्या करिअरची १२ वर्षं इथे घालवली आहेत आणि सगळ्यात जास्त सिनेमे इथेच केले. त्यामुळे बंगळुरु माझी कर्मभूमी आहे," असं शान्वीने सांगितलं.