
मुंबई : 'बटवारा 1947' हा सिनेमा रिलीज होण्याआधीच सनी देओल एका नव्या वादात सापडला आहे. पाटण्यात सिनेमाच्या प्रमोशनवेळी पाकिस्तानबद्दल विचारलेल्या एका प्रश्नावर त्याने उत्तर दिलं. यावेळी त्याने त्याचे वडील आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची जुनी गोष्ट पुन्हा सांगितली आणि पाकिस्तानला 'मावशी' म्हटलं. सनीचं हे विधान सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालं, त्यानंतर अनेक युजर्सनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली. तर काही लोकांनी याला सिनेमाच्या प्रमोशनचा भाग म्हटलं आहे. दरम्यान, या सिनेमाची स्टारकास्ट आणि कथाही सतत चर्चेत आहे.
पाटण्यामध्ये 'बटवारा 1947' च्या प्रमोशनवेळी सनी देओलला पाकिस्तानबद्दल प्रश्न विचारण्यात आला. सिनेमाची कथा भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्यामुळे, त्याला शेजारी देशाबद्दल त्याचं मत विचारलं गेलं. यावर सनी देओल म्हणाला, "पहिलं तर दोन्ही देश एकच होते. माझे वडील म्हणायचे की, भारत आपली आई आहे आणि पाकिस्तान भारतातूनच वेगळा झाला, त्यामुळे तो आपली मावशी झाली. आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत."
सनी देओलचं हे विधान समोर येताच सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. अनेक युजर्सनी त्याच्या बोलण्यावर नाराजी व्यक्त केली आणि सध्याच्या भारत-पाकिस्तान संबंधांचा दाखला देत प्रश्न विचारले. उदाहरणार्थ, एका युजरने लिहिलं, "संधीसाधूपणा ही एक कला असेल, तर सनी देओल त्याचा सर्वात मोठा कलाकार आहे." दुसऱ्या एका युजरने कमेंट केली, "सगळं बॉलिवूड असंच आहे. यात कुणी अपवाद नाही. तुम्ही परेश रावल यांच्या अलीकडच्या मुलाखती पाहिल्या नाहीत का?"
If opportunism is an art, Sunny Deol is the artist. pic.twitter.com/aCnQDWY8KV
— AS. (@anshikaasaxena) August 3, 2026
एका दुसऱ्या युजरने सिनेमावर निशाणा साधत लिहिलं, “'इक्कीस'मध्ये धर्मेंद्र पाकिस्तानवर विचारल्यावर म्हणतात, 'कोण शत्रू?' 'अल्फा'मध्ये बॉबी देओलचं पात्र वेगळा मार्ग निवडतं आणि आता 'बटवारा 1947'साठी सनी देओल पाकिस्तानला मावशी म्हणतोय. हा पॅटर्न समजून घ्या.” आणखी एका कमेंटमध्ये लिहिलं आहे, "वास्तवापासून दूर असलेल्या अशा कलाकारांचा राग येतो. त्यांना भारत-पाकिस्तानमधील सध्याची परिस्थिती माहीत नाही का? पाकिस्तानी कलाकारांना कधी भारताविषयी असं बोलताना पाहिलंय का? हा फक्त लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे."
'बटवारा 1947' हा भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर बनलेला एक पीरियड ड्रामा सिनेमा आहे. या सिनेमात हिंसा, स्थलांतर आणि विभक्त होण्याच्या वेदनेतून आपला जीव वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. सिनेमात सनी देओल, शबाना आझमी, प्रिती झिंटा, अली फजल आणि अभिमन्यू सिंग यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं असून आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली याची निर्मिती झाली आहे.