Relationship: तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र असतं असं म्हणतात. त्याचे फायदे जसे आहेत, तसे तोटेही. त्यात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) एन्ट्रीमुळे जगात मोठे बदल घडत आहेत.
अमेरिका आणि युरोपमध्ये एक नवीन ट्रेंड दिसतोय. नात्यात अडचणी आल्यावर लोक मित्र किंवा कुटुंबाऐवजी AI चॅटबॉट्सची मदत घेत आहेत. काही जण तर AI सोबत भावनिकरित्या इतके जोडले जात आहेत की, त्यालाच आपला सोबती मानू लागले आहेत. एका वृद्धाने AI च्या प्रेमात पडून पत्नीकडे घटस्फोट मागितल्याची घटनाही घडली आहे.
25
AI मुळेच समस्या निर्माण होत आहेत?
या घटना पाहिल्यावर असं वाटू शकतं की AI मुळेच समस्या निर्माण होत आहेत. पण खरं तर, अनेक नात्यांमध्ये आधीपासूनच अडचणी असतात. AI या अडचणी निर्माण करत नाही, तर त्या फक्त वेगाने समोर आणतं. तज्ज्ञांच्या मते, AI हे फक्त एक साधन आहे, जे आधीपासून असलेल्या समस्यांना अधिक ठळक करतं.
35
भारतात परिस्थिती कशी?
भारतात ही परिस्थिती अजून गंभीर झालेली नाही, पण बदल हळूहळू दिसतोय. लोक आता वैयक्तिक समस्यांवर कुटुंबाऐवजी AI शी बोलू लागले आहेत. 'ChatGPT च्या मते माझं लग्न तुटलंय,' असं म्हणणारेही आहेत. घटस्फोट वकील वंदना शाह यांच्या मते, भारतात घटस्फोटावर सामाजिक दबाव असल्याने, लोक AI ला एक खासगी आणि सुरक्षित जागा मानत आहेत, जिथे कोणी त्यांना जज करत नाही.
AI चं एक वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्याच मताला दुजोरा देतं. म्हणजे, आपण आपल्या पार्टनरबद्दल चुकीचं चित्र उभं केलं, तर AI सुद्धा त्याच बाजूने प्रतिसाद देतं. नात्यातील समस्यांना अनेक बाजू असतात, पण AI आपली बाजू खरी मानून प्रतिसाद देतं. यामुळे लोक अविचारीपणे चुकीचे निर्णय घेऊ शकतात.
55
आधीपासून असलेल्या समस्या ओळखणं महत्त्वाचं
मानसशास्त्रज्ञांच्या मते, AI फक्त तात्पुरता भावनिक आधार देऊ शकतं, पण ते समुपदेशकाची जागा घेऊ शकत नाही. खरं समुपदेशन समस्येच्या मुळाशी जातं. कायद्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, भारतात 'AI मुळे घटस्फोट' अशी केस अजून दाखल झालेली नाही. पण कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, AI च्या वापरामुळे नात्यात भावनिक अंतर वाढल्यास त्याला 'मानसिक छळ' मानलं जाऊ शकतं. त्यामुळे नातं तुटल्यास AI ला दोष देण्याऐवजी, नात्यात आधीपासून असलेल्या समस्या ओळखणं महत्त्वाचं आहे.