
Term Insurance Buying Tips : आजच्या धकाधकीच्या जीवनात भविष्यातील आर्थिक सुरक्षितता हा प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचा विषय बनला आहे. अनपेक्षित परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी अनेक जण टर्म इन्शुरन्सचा पर्याय निवडतात. मात्र विमा घेताना अनेकजण केवळ प्रीमियम किती कमी आहे यावर भर देतात आणि इतर महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करतात. यामुळे गरजेच्या वेळी विमा पॉलिसी अपेक्षित लाभ देऊ शकत नाही. त्यामुळे टर्म इन्शुरन्स निवडताना काही मूलभूत गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.
ऑनलाइन विविध विमा कंपन्यांच्या योजना सहज उपलब्ध असल्याने अनेकजण सर्वात कमी प्रीमियम असलेली पॉलिसी निवडतात. मात्र हा निर्णय नेहमीच योग्य ठरेल असे नाही. विमा कंपनीची विश्वासार्हता, ग्राहक सेवा, क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया आणि कंपनीचा अनुभव हे घटकही तितकेच महत्त्वाचे असतात. काही वेळा थोडा जास्त प्रीमियम भरून विश्वासार्ह कंपनीची योजना निवडणे भविष्यासाठी अधिक सुरक्षित ठरू शकते.
अनेक जण आपल्या आर्थिक जबाबदाऱ्यांचा योग्य विचार न करता विमा रक्कम ठरवतात. प्रत्यक्षात विमा कव्हर ठरवताना वार्षिक उत्पन्न, गृहकर्ज, वाहन कर्ज, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा मासिक खर्च आणि भविष्यातील आर्थिक गरजा यांचा विचार करणे गरजेचे असते. जर विमा कव्हर अपुरा असेल तर कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे विमा रक्कम निवडताना दीर्घकालीन नियोजन महत्त्वाचे ठरते.
विमा पॉलिसी घेताना आकर्षक फायदे पाहून अनेकजण करारातील अटी व नियम वाचत नाहीत. विशेषतः कोणत्या परिस्थितीत क्लेम मंजूर होणार नाही, याची माहिती घेणे आवश्यक असते. याशिवाय आरोग्यविषयक माहिती, धूम्रपानाची सवय किंवा पूर्वीचे आजार लपवणे ही गंभीर चूक ठरू शकते. अशा परिस्थितीत विमा कंपनी क्लेम नाकारू शकते. त्यामुळे अर्ज भरताना संपूर्ण आणि अचूक माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे.
सध्या विमा कंपन्या गंभीर आजार, अपघाती मृत्यू लाभ, प्रीमियम माफी यांसारखे विविध ऑफर्स देतात. याचे अतिरिक्त फायदे उपयुक्त असले तरी प्रत्येक ऑफर सर्वांनाच आवश्यक असेलच असे नाही. ऑफर्समुळे प्रीमियम वाढतो. त्यामुळे स्वतःच्या जीवनशैलीचा, आरोग्याचा आणि आर्थिक गरजांचा विचार करूनच योग्य ऑफर्स निवडावेत.
विमा कंपनी निवडताना अनेकजण फक्त क्लेम सेटलमेंट रेशो (CSR) पाहतात. हा महत्त्वाचा निकष असला तरी तो एकमेव निकष नाही. क्लेम प्रक्रियेची सुलभता, ग्राहकांना मिळणारे मार्गदर्शन, डिजिटल सुविधा आणि कंपनीचा प्रतिसाद यांचाही विचार करणे गरजेचे आहे. कारण क्लेमच्या वेळी कुटुंबाला अनावश्यक त्रास होऊ नये, हेही तितकेच महत्त्वाचे असते.