
मुंबई : टाटा मोटर्सची पंच ही भारतीय बाजारातली एक प्रचंड लोकप्रिय गाडी आहे. पेट्रोल आणि सीएनजीसोबतच, इलेक्ट्रिक गाडी म्हणूनही पंचने टाटाला बाजारात एक मजबूत स्थान मिळवून दिलं आहे. पण आता कंपनीने पंचच्या चाहत्यांना एक मोठा झटका दिला आहे. कंपनीने पंचच्या संपूर्ण रेंजच्या, म्हणजेच पेट्रोल, सीएनजी आणि ईव्ही मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. काही निवडक व्हेरिएंटसाठी ही वाढ तब्बल २०,००० रुपयांपर्यंत आहे. या नव्या किमती तात्काळ लागू झाल्या आहेत. त्यामुळे, जर तुम्ही पंच किंवा पंच ईव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागतील.
टाटा पंचच्या पेट्रोल इंजिनवाल्या व्हेरिएंटच्या किमती ५,००० ते १०,००० रुपयांनी वाढल्या आहेत. या दरवाढीनंतर या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत ५.७५ लाख रुपयांपासून सुरू होऊन टॉप व्हेरिएंटसाठी १०.७७ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ज्यांना ही गाडी बुक करायची आहे, त्यांना आता या नवीन किमतींनुसारच बुकिंग करावी लागेल.
टाटा मोटर्सने पंच ईव्हीच्या विविध व्हेरिएंटच्या किमतीतही वाढ केली आहे. ही गाडी स्मार्ट, अॅडव्हेंचर आणि एम्पॉवर्ड अशा तीन मुख्य व्हेरिएंटमध्ये येते. यात ३० kWh आणि ४० kWh अशा दोन बॅटरी पॅकचे पर्याय मिळतात. ३० kWh बॅटरी असलेल्या स्मार्ट आणि स्मार्ट प्लस व्हेरिएंटच्या किमतीत १०,००० रुपयांची वाढ झाली आहे. तर ४० kWh बॅटरी असलेल्या स्मार्ट, स्मार्ट प्लस, अॅडव्हेंचर, एम्पॉवर्ड आणि एम्पॉवर्ड प्लस एस या व्हेरिएंटसाठी थेट २०,००० रुपये जास्त मोजावे लागतील. या दरवाढीनंतर टाटा पंच ईव्हीची एक्स-शोरूम किंमत आता ९.७९ लाख ते १२.९९ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कंपनीने किमती वाढवल्या असल्या तरी पंच किंवा पंच ईव्हीच्या फीचर्समध्ये किंवा मेकॅनिकल स्पेसिफिकेशन्समध्ये कोणताही बदल केलेला नाही. गाडी जशी होती, तशीच मिळणार आहे, फक्त किंमत जास्त असेल. पंच ईव्हीच्या ३० kWh बॅटरी पॅकसोबत ८८ पीएस पॉवरची इलेक्ट्रिक मोटर मिळते, तर मोठ्या ४० kWh बॅटरी पॅकसोबत १३० पीएस पॉवरची मोटर आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ३० kWh बॅटरी असलेली गाडी एका चार्जमध्ये ३७५ किलोमीटरपर्यंत धावते, तर ४० kWh बॅटरी असलेली गाडी ४६८ किलोमीटरपर्यंतची रेंज देते.
ज्या ग्राहकांना अजून इलेक्ट्रिक गाडी घ्यायची नाही, त्यांच्यासाठी पंच पेट्रोल आणि सीएनजी पर्यायांमध्येही उपलब्ध आहे. व्हेरिएंटनुसार मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचे पर्यायही मिळतात.
भारताच्या इलेक्ट्रिक कार बाजारात टाटा मोटर्सची मजबूत पकड कायम आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या (FADA) आकडेवारीनुसार, 2026 ऑगस्टमध्ये देशात एकूण ३०,६८६ इलेक्ट्रिक कार्सची नोंदणी झाली. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही ५२ टक्क्यांची वाढ आहे.
ऑगस्ट महिन्यात टाटा मोटर्सने १३,१५८ इलेक्ट्रिक कार्सच्या नोंदणीसह पहिलं स्थान कायम ठेवलं. पंच ईव्ही आणि नेक्सॉन ईव्ही या गाड्यांनी कंपनीच्या विक्रीत मोठा वाटा उचलला. इलेक्ट्रिक कार बाजारात टाटा मोटर्सचा वाटा जवळपास ४३ टक्के होता. महिंद्रा ६,४६४ नोंदणींसह दुसऱ्या स्थानी, तर जेएसडब्ल्यू एमजी मोटर ४,६२२ युनिट्ससह तिसऱ्या स्थानी राहिली. देशातील एकूण इलेक्ट्रिक कार विक्रीपैकी जवळपास ६४ टक्के विक्री एकट्या टाटा मोटर्स आणि महिंद्राने केली आहे. यावरून भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात टाटाचा दबदबा किती आहे, याचा अंदाज येतो.