
आपल्या घरात तुळशीचं रोप फक्त श्रद्धेचं प्रतीक नाही, तर एक नैसर्गिक औषधही आहे. पण अनेकदा योग्य काळजी न घेतल्याने, जास्त पाणी घातल्याने, खराब माती किंवा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तुळस सुकायला लागते. विशेषतः हिवाळ्यात ही समस्या जास्त वाढते. अशावेळी लोक वेगवेगळे घरगुती उपाय करून पाहतात. त्यापैकीच एक उपाय म्हणजे "मीठ घालणे". पण लक्षात ठेवा, आपलं साधं खाण्याचं मीठ (टेबल सॉल्ट) रोपासाठी हानिकारक ठरू शकतं, किंबहुना ते रोपाला आणखी सुकवू शकतं. योग्य मीठ आणि योग्य प्रमाणात वापरल्यासच तुळस पुन्हा हिरवीगार होऊ शकते.
तुळशीच्या रोपाच्या वाढीसाठी एप्सम सॉल्ट (मॅग्नेशियम सल्फेट) सर्वात चांगलं मानलं जातं. यात मॅग्नेशियम आणि सल्फर असतं, जे पानांना हिरवीगार बनवण्यासाठी आणि मुळांना मजबूत करण्यासाठी मदत करतं. यामुळे क्लोरोफिल तयार होण्याची प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे पानं अधिक गडद हिरवी आणि निरोगी दिसतात.
आपल्या स्वयंपाकघरातलं साधं मीठ (सोडियम क्लोराइड) मातीचा कस कमी करतं. त्यामुळे माती कडक होते आणि मुळं पाणी व पोषक तत्वं व्यवस्थित शोषू शकत नाहीत. म्हणूनच तुळशीमध्ये कधीही साधं मीठ टाकू नका.
पाण्याचा निचरा आणि सूर्यप्रकाश: तुळशीला रोज ४-५ तास हलकं ऊन मिळायला हवं. कुंडीला चांगली ड्रेनेज होल्स असावीत, जेणेकरून पाणी साचून राहणार नाही.
कडुलिंबाचं पाणी आणि सेंद्रिय खत: महिन्यातून एकदा कडुलिंब-पाणी टाकल्यास बुरशी आणि कीड लागत नाही. किचनमधील ओल्या कचऱ्यापासून बनवलेलं कंपोस्ट किंवा शेणखतही तुळशीची वाढ सुधारते.