
मुंबई : जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय गोष्टींचा परिणाम भारतात होताना दिसतो. यापैकी महत्त्वाचं म्हणजे देशभरात वाढणारी महागाई. यावर्षीच्या दुसऱ्याच महिन्यात फेब्रुवारीमध्ये इराण आणि अमेरिकेतील युद्धाने महागाईत वाढ झाली आहे. भारतात जवळपास सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. जीवनावश्यक अन्नपदार्थ, वस्तूंच्या किमतीत तब्बल ९९ टक्क्यांची वाढ झाली आहे. एका अहवालातून याबाबत माहिती समोर आली आहे.
खाद्यतेल, कडधान्यांच्या किमती सर्वाधिक वाढल्या
इराण - अमेरिकेतील युद्ध सुरू झाल्यानंतर भारतात खाद्यपदार्थांच्या, कडधान्यांच्या आणि खाद्यतेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. प्राइज मॉनिटरिंग सिस्टम या अहवालातून खाद्यपदार्थ, रेशन वस्तूंवरील दरात ९९ टक्के वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे. अहवालातील माहितीनुसार, ३६ पैकी ३५ जीवनावश्यक खाद्यपदार्थांमध्ये दरवाढ झाली आहे. या वाढीमागे पाऊस हेदेखील एक महत्त्वाचं कारण सांगण्यात आलं आहे.
काही तज्ज्ञांनी याबाबत बोलताना सांगितलं, की कडधान्यांच्या किमती वाढण्यामागे पावसाचं कमी प्रमाण हे एक महत्त्वाचं कारण आहे. कडधान्याच्या पीकात कमी झाली आहे. खरीप हंगामातील पीक २०२५ च्या तुलनेत यंदा २०२६ मध्ये ७ टक्क्यांनी कमी झालं आहे. कमी पावसामुळे उत्पन्न कमी झालं आहे. त्यामुळे आयात वाढली आहे. त्याचाच परिणाम कडधान्याच्या वाढत्या किमतीवर होतो आहे.
दुसरीकडे जुलै, ऑगस्ट महिन्यापासून देशभरात अनेक सण-उत्सवांची सुरुवात होत आहे. या फेस्टिव्ह सीजनमध्ये आणखी महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. श्रावण महिना, रक्षाबंधन, जन्माष्ठमी, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असे देशभरात अनेक सण एकामागे एक येणार आहे. या सणांच्या काळात खरेदी मोठ्या प्रमाणात होते. प्रत्येक सणाला लागणारे त्या-त्या वेळीच्या वस्तू, खाद्यपदार्थ यांची मागणी वाढते. साखर, गोड खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढू शकतात. अशात महागाईदेखील वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी अशाच सुरू राहिल्या तर महागाई कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. उलट यात वाढ होण्याचीच शक्यता अधिक आहे, असं मत तज्ज्ञांकडून मांडण्यात आलं आहे.