
PM सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत घरांवर सोलर पॅनल बसवण्याच्या कामाला जबरदस्त गती आली आहे. जुलै २०२६ मध्ये दररोज १६,००० हून अधिक घरांवर सोलर पॅनल बसवले जात आहेत. हा आकडा ऑक्टोबर २०२५ च्या तुलनेत तिपटीपेक्षा जास्त आहे, अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी दिली.
नवी दिल्लीतील ऊर्जा क्षेत्रावरील एका कार्यक्रमात बोलताना जोशी म्हणाले की, या योजनेचा विस्तार आता ५० लाख कुटुंबांपर्यंत झाला आहे. यामुळे देशभरात रूफटॉप सोलरसाठी एक चांगली इकोसिस्टीम तयार होत आहे आणि देशांतर्गत उत्पादनालाही चालना मिळत आहे. "PM सूर्य घर मोफत वीज योजना थेट घराघरात स्वच्छ ऊर्जा पोहोचवून देशाचं ऊर्जा क्षेत्र बदलत आहे. आज ५० लाख कुटुंबं या योजनेचा लाभ घेत आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये रोज सुमारे ५,००० पॅनल बसवले जात होते, पण आता जुलै २०२६ मध्ये हा वेग तिपटीने वाढून रोज १६,००० हून अधिक झाला आहे," असं जोशींनी सांगितलं.
जोशी पुढे म्हणाले की, भारत लवकरच ३०० GW स्थापित गैर-जीवाश्म इंधन वीज क्षमतेचा टप्पा गाठणार आहे आणि २०३० पर्यंत ५०० GW चे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने देशाची वाटचाल योग्यप्रकारे सुरू आहे. सरकारने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला बळकट करण्यासाठी अनेक धोरणात्मक पावले उचलली आहेत. यामध्ये हाय एफिशियन्सी सोलर पीव्ही मॉड्यूल्ससाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजना, ग्रीन एनर्जी कॉरिडॉर कार्यक्रम, नवीकरणीय ऊर्जा उपकरणे आणि घटकांवरील जीएसटीमध्ये कपात, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमसाठी (BESS) लिथियम-आयन सेल निर्मितीसाठी लागणाऱ्या भांडवली वस्तूंवरील सीमा शुल्कात (Basic Customs Duty) सूट आणि रिन्यूएबल एनर्जी इक्विपमेंट इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टीम यांचा समावेश आहे.
जोशी यांनी उद्योगांना आवाहन केले की, त्यांनी नव्या पिढीच्या सोलर टेक्नॉलॉजी, एनर्जी स्टोरेज सोल्यूशन्स आणि इतर उदयोन्मुख स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये संशोधन आणि विकासावर (R&D) अधिक गुंतवणूक करावी.
केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी म्हणाले की, भारताची ऊर्जा सुरक्षा ही आता स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान तयार करण्याच्या आणि देशातच एक मजबूत सप्लाय चेन तयार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असेल. "भारत जसा स्वच्छ ऊर्जेकडे वेगाने वाटचाल करत आहे, तशी ऊर्जा सुरक्षा केवळ संसाधनांच्या उपलब्धतेवर अवलंबून नाही. तर भविष्यातील तंत्रज्ञान देशातच तयार करण्याची, नवनवीन शोध लावण्याची आणि एक मजबूत सप्लाय चेन बनवण्याच्या आपल्या क्षमतेवर ती अवलंबून असेल," असं कुमारस्वामी म्हणाले.
या कार्यक्रमात देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, प्रादेशिक सहकार्य वाढवणे आणि भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा परिवर्तनाला पाठिंबा देण्यासाठी मजबूत सप्लाय चेन तयार करण्यावर चर्चा झाली. (ANI)