
पावसाळा सुरू झाला की जमिनीवर गांडुळं दिसायला लागतात, हे तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. जमिनीखाली पाणी भरल्यामुळे आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे बिचारे जीव वाचवण्यासाठी वर येतात. पण अनेकदा माहिती नसल्यामुळे लोक त्यांना काढून टाकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की, गांडुळं जमिनीला सुपीक बनवतात आणि झाडांच्या वाढीसाठी थेट मदत करतात. त्यामुळे झाडांची वाढ चांगली व्हावी असं वाटत असेल, तर तुम्ही गांडुळांची संख्या वाढवण्यासाठी काही खास गोष्टी करायला हव्यात.
जर तुम्ही जमिनीत शेणखत, कंपोस्ट खत आणि पालापाचोळ्याचं खत टाकलं, तर त्यामुळे गांडुळांना चांगलं खाद्य मिळतं. यामुळे त्यांची वाढही वेगाने होते आणि माती अधिक सुपीक बनते.
वाळलेलं गवत, पानं आणि पिकांचे अवशेष जमिनीवर पसरल्याने जमिनीतला ओलावा टिकून राहतो आणि गांडुळांना अनुकूल वातावरण मिळतं. तुम्ही तुमच्या घरातील लहान बागेपासून ते मोठ्या शेतापर्यंत कुठेही मल्चिंग करू शकता. यामुळे माती सुपीक होण्यास मदत होईल.
वर्मी कंपोस्टला गांडूळ खत (Organic Fertilizer) असंही म्हणतात. याचा वापर करून गांडुळांची संख्या वाढवता येते. शेण, सुकी पानं, स्वयंपाकघरातील ओला कचरा आणि इतर सेंद्रिय पदार्थ एकत्र करून हे खत तयार केलं जातं. वर्मी कंपोस्टिंगच्या प्रक्रियेमुळे गांडुळं मातीला अधिक सुपीक बनवतात.
हे पण वाचा: फक्त १० रुपयांत झाडांसाठी अमृत, वाढ होईल दुप्पट वेगाने!
मातीमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी किंवा शक्यतो पूर्णपणे टाळायला हवा. यामुळे फक्त गांडुळंच मरत नाहीत, तर झाडांवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे नेहमी सेंद्रिय पर्यायांना प्राधान्य द्या.
वारंवार किंवा खूप खोल नांगरणी केल्यामुळे गांडुळांची बिळं आणि त्यांची अंडी नष्ट होतात. त्यामुळे फक्त वरच्यावर हलकी खुरपणी करावी. विशेषतः पावसाळ्यात गांडुळांना इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्या.
हे पण वाचा: आंब्याच्या सालींपासून बनवा नैसर्गिक खत, झाडं वाढतील झपाट्याने