
Free Cooking Gas: इराण आणि इस्रायल-अमेरिका युद्धामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे, पण त्याचा सर्वात मोठा फटका आपल्या स्वयंपाकघराला बसत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक बंद झाल्यामुळे आखाती देशांकडून येणारा गॅस पुरवठा थांबला आहे. 'शिवालिक'सारखी जहाजं काही प्रमाणात दिलासा देत असली तरी, संकट पूर्णपणे टळलेलं नाही. जर तुम्ही सिलेंडरसाठीच्या लांब रांगा आणि काळाबाजाराला कंटाळला असाल, तर बायोगॅस तुमच्यासाठी एक वरदान ठरू शकतो. चला, जाणून घेऊया घरच्या कचऱ्यापासून स्वतःचा गॅस कसा बनवायचा...
युद्धामुळे आखाती देशांमधील (UAE, कतार, सौदी) गॅस प्लांटवर परिणाम झाला आहे. भारत आपल्या गरजेच्या ६०% गॅस याच देशांकडून आयात करतो. त्यातच, लोक घाबरून दररोज ८८ लाख सिलेंडर बुक करत आहेत, तर कंपन्यांची क्षमता त्यापेक्षा खूप कमी आहे. भारताला ९०% परदेशी LPG ज्या होर्मुझच्या मार्गाने मिळतो, तिथून आता मोजकीच जहाजं ये-जा करू शकत आहेत.
ज्याप्रमाणे गाय-म्हशीचं शेण कुजल्यावर त्यातून गॅस बाहेर पडतो, अगदी त्याचप्रमाणे तुमच्या किचनमधील ओला कचरा (उदा. भाजीपाल्याची सालं, उरलेलं शिळं अन्न) सुद्धा गॅस तयार करतो. हा गॅस एका टाकीत जमा करून पाईपद्वारे थेट तुमच्या गॅस शेगडीपर्यंत पोहोचवला जातो. यालाच बायोगॅस म्हणतात.
हो, भारत सरकार बायोगॅस प्लांट लावण्यासाठी मोठी सबसिडी देते. ही सबसिडी 'राष्ट्रीय बायोगॅस आणि खत व्यवस्थापन कार्यक्रमा'अंतर्गत (NBMMP) दिली जाते. जर तुम्ही गावात राहत असाल किंवा तुमच्याकडे थोडी जागा असेल, तर तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेऊन अगदी कमी खर्चात हा प्लांट बसवू शकता.