Health Tips: आजकाल अनेक घरांमध्ये RO (रिव्हर्स ऑस्मोसिस) वॉटर प्युरिफायरचा वापर वाढला आहे. पण RO ने शुद्ध केलेले पाणी प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो, असा काहींचा समज आहे. या दाव्यात किती तथ्य आहे, हे आपण आता जाणून घेऊया.
RO टेक्नॉलॉजी पाण्याला एका विशेष मेंब्रेनमधून (पातळ पडदा) दाब देऊन पुढे पाठवते. या प्रक्रियेत पाण्यातील बॅक्टेरिया, व्हायरस, क्षार, जड धातू आणि इतर हानिकारक घटक काढून टाकले जातात. जिथे भूगर्भातील पाणी जास्त प्रदूषित आहे, तिथे ही पद्धत खूप उपयुक्त ठरते. पण, या प्रक्रियेत पाण्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी नैसर्गिक खनिजेही कमी होऊ शकतात. याच कारणामुळे RO पाणी आरोग्यासाठी चांगलं नाही, असा दावा केला जातो.
25
आहारातून ही कमतरता भरून निघते का?
RO पाण्यामुळे खनिजे कमी झाली तरी आपण खात असलेल्या आहारातून ती कमतरता भरून निघते, असं तज्ज्ञ सांगतात. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट पलक नागपाल यांच्या मते, आपल्या शरीराला लागणाऱ्या खनिजांपैकी खूप कमी भाग पिण्याच्या पाण्यातून मिळतो. बहुतेक खनिजे आपण खात असलेल्या अन्नातूनच मिळतात. रोजच्या आहारात फळे, भाज्या, धान्य आणि प्रोटीनयुक्त पदार्थ असतील, तर RO पाण्यातील खनिजे कमी झाली तरी शरीराला फारसा फरक पडत नाही. म्हणजेच, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी महत्त्वाची खनिजे मुख्यत्वे आहारातूनच मिळतात.
35
ही खनिजं कोणत्या पदार्थांमधून मिळतात?
आपल्या रोजच्या आहारात काही पदार्थ समाविष्ट केल्यास शरीराला आवश्यक खनिजे सहज मिळतात.
* कॅल्शियम: दूध, दही, पनीर, नाचणी, तीळ, बदाम, पालेभाज्या. हे हाडे आणि दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे.
* मॅग्नेशियम: काजू, बदाम, भोपळ्याच्या बिया, ओट्स, ब्राऊन राईस, डाळी. हे स्नायू आणि नसांच्या कार्यासाठी उपयुक्त आहे.
* पोटॅशियम: केळी, नारळ पाणी, रताळे, डाळी, बीन्स, पालेभाज्या. हे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणासाठी महत्त्वाचे आहे.
हे पदार्थ नियमितपणे खाल्ल्यास शरीराला पुरेशी खनिजे मिळतात, असं तज्ज्ञ सांगतात.
किडनी तज्ज्ञांच्या मते, RO पाणी सामान्यतः किडनीसाठी हानिकारक नाही. नोएडा येथील कैलाश हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अनिश नंदा सांगतात की, RO सिस्टीम पाण्यातील हानिकारक पदार्थ काढून टाकण्यासाठी बनवली आहे. जरी काही खनिजे कमी झाली, तरी ती शरीराला मुख्यत्वे आहारातूनच मिळतात. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे, चांगला आहार घेणे आणि निरोगी जीवनशैली ठेवल्यास किडनीचे आरोग्य चांगले राहू शकते.
55
RO पाणी जास्त प्यायल्याने इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडतं का?
काही लोकांना भीती वाटते की, जास्त काळ RO पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडते. पण डॉक्टरांच्या मते, निरोगी व्यक्तींमध्ये असा धोका खूप कमी असतो. आपल्या शरीरातील किडनी आणि हार्मोन्स मिळून इलेक्ट्रोलाइटची पातळी नियंत्रित करतात. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियमसारखे इलेक्ट्रोलाइट्ससुद्धा बहुतेक करून आहारातूनच मिळतात. त्यामुळे शुद्ध केलेले RO पाणी प्यायल्याने सहसा कोणतीही मोठी समस्या उद्भवत नाही, असे तज्ज्ञ सांगतात.
थोडक्यात, RO पाणी खनिजे पूर्णपणे काढून टाकते आणि आरोग्यासाठी हानिकारक आहे, हा समज पूर्णपणे योग्य नाही. संतुलित आहार घेतल्यास आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे शुद्ध आणि सुरक्षित पाणी पिणे, चांगला आहार घेणे आणि शरीर हायड्रेटेड ठेवणे हेच निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. टीप: वरील माहिती केवळ प्राथमिक स्वरूपाची आहे. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य राहील.