Food Safety: घरात पाली फिरणं ही सामान्य गोष्ट आहे, पण जर पालीने आपल्या खाण्याच्या पदार्थांना स्पर्श केला तर काय होऊ शकतं? पालीने तोंड लावलेलं अन्न खरंच विषारी असतं की हा फक्त एक गैरसमज आहे? याबद्दल डॉक्टरांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला जाणून घेऊया.
आपल्या घरात, विशेषतः स्वयंपाकघरात पाली फिरताना दिसतात. अनेकदा आपण फळं कापून टेबलवर ठेवतो किंवा अन्नपदार्थांवर झाकण ठेवायला विसरतो. जर पालीने त्या अन्नाला तोंड लावलं आणि तेच अन्न आपण नकळत खाल्लं तर काय होईल? ते खरंच विषारी बनतं का? याबद्दल प्रसिद्ध ईएनटी (ENT) तज्ज्ञ, प्रोफेसर डॉ. बी.पी.एस. त्यागी यांनी सोशल मीडियावर महत्त्वाची माहिती दिली आहे.
25
अन्नामध्ये पसरतो धोकादायक बॅक्टेरिया
डॉ. त्यागी यांच्या मते, पालीने अन्नाला स्पर्श केल्याने ते थेट विषारी होत नाही. पण, पालीसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या (Reptiles) शरीरात आणि लाळेत 'साल्मोनेला' (Salmonella) नावाचा धोकादायक बॅक्टेरिया असतो. जेव्हा पाल अन्नाचा चावा घेते किंवा चाटते, तेव्हा हा बॅक्टेरिया अन्नात किंवा फळांमध्ये जातो. कधीकधी अन्नावर पालीने चावल्याच्या खुणा स्पष्ट दिसत नाहीत. असं अन्न खाल्ल्यास आपल्याला गंभीर संसर्ग होऊ शकतो.
35
फूड पॉयझनिंगचा गंभीर धोका
हे दूषित अन्न खाल्ल्यामुळे गंभीर फूड पॉयझनिंग (Food Poisoning) होऊ शकते. यामुळे मळमळ, उलट्या, पोटात तीव्र वेदना आणि पेटके येऊ शकतात. डिहायड्रेशन (निर्जलीकरण) ज्यामुळे होतं असा जुलाब (डायरिया), ताप आणि थकवा येतो. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींमध्ये ही लक्षणं अधिक गंभीर असू शकतात, ज्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येऊ शकते आणि जीवावरही बेतू शकतं.
*स्वयंपाकघरात किंवा डायनिंग टेबलवर ठेवलेल्या अन्नपदार्थांवर आणि फळांवर नेहमी झाकण ठेवा.
*केळी, संत्री, सफरचंद यांसारखी फळं खाण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवा आणि साल काढून खा.
*जर एखादं फळ खूप मऊ झालं असेल आणि त्यावर पालीने चावा घेतला असावा अशी शंका आल्यास, ते धुण्याऐवजी फेकून देणंच योग्य. कारण बॅक्टेरिया फळाच्या आतपर्यंत पसरण्याची शक्यता असते.
*पालीने तोंड लावलेलं किंवा पाल पडलेलं अन्न कोणत्याही परिस्थितीत खाऊ नका.
55
थेट विषारी नसलं तरी...
पालीने तोंड लावलेलं अन्न थेट विषारी नसलं तरी, तिच्यामुळे पसरणाऱ्या बॅक्टेरियामुळे विषापेक्षाही जास्त धोकादायक आजार होऊ शकतात, हे अगदी खरं आहे. त्यामुळे, आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा न करता, अन्न सुरक्षेचे नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.