
IPL 2026 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यानंतर आरसीबीच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष सुरू असतानाच एक वेगळाच क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली आणि राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यांच्यातील भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, वैभवच्या नम्र वागणुकीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत.
आरसीबीच्या विजेतेपदाच्या जल्लोषादरम्यान राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी देखील स्टेडियममध्ये उपस्थित होता. सामना संपल्यानंतर विराट कोहली स्वतः वैभवला भेटण्यासाठी पुढे गेला. त्यावेळी वैभव आरसीबीचा फिरकीपटू सुयश शर्मा आणि अन्य खेळाडूंशी संवाद साधत होता.
विराटने हस्तांदोलनासाठी हात पुढे केल्यानंतर वैभवने अत्यंत नम्रपणे हात जोडून त्याला नमस्कार केला. युवा खेळाडूच्या या संस्कारी कृतीने विराटदेखील प्रभावित झाला. त्याने वैभवच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी काही क्षण संवाद साधला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
King meets Bihari Monster 💀 pic.twitter.com/927R0z8kF3
— सीतामढ़ी जिला 🇮🇳 (@SitamarhiJila) June 1, 2026
फायनलमध्ये गुजरात टायटन्सने दिलेले 156 धावांचे आव्हान आरसीबीने पाच गडी राखून पूर्ण केले. विराट कोहलीने पुन्हा एकदा मोठ्या सामन्यात जबाबदारी उचलत 42 चेंडूत नाबाद 75 धावांची शानदार खेळी केली.त्याच्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. व्यंकटेश अय्यर आणि टिम डेव्हिड यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. गुजरातकडून रशीद खानने दोन बळी घेतले, मात्र कोहलीसमोर गुजरातचे गोलंदाज निष्प्रभ ठरले.
राजस्थान रॉयल्स संघ अंतिम फेरी गाठू शकला नसला तरी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीसाठी हा हंगाम अविस्मरणीय ठरला. संपूर्ण स्पर्धेत त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने जगातील नामांकित गोलंदाजांना धक्का दिला. 15 सामन्यांत त्याने 48.50 च्या सरासरीने आणि तब्बल 237.70 च्या स्ट्राइक रेटने 776 धावा केल्या. या धावांमध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता.
आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने एकाच हंगामात पाच प्रतिष्ठेचे पुरस्कार जिंकत नवा इतिहास रचला.
मिळालेले पुरस्कार:
या कामगिरीनंतर त्याला भारतीय टी-20 संघात तातडीने संधी देण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
आयपीएल संपल्यानंतर वैभवला विश्रांती मिळणार नाही. आगामी भारत ‘अ’, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील त्रिकोणी एकदिवसीय मालिकेसाठी त्याची भारत ‘अ’ संघात निवड झाली आहे. 9 जूनपासून श्रीलंकेत सुरू होणाऱ्या या स्पर्धेत वैभव भारतीय जर्सीत पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेची झलक दाखवताना दिसणार आहे.