
T20 World Cup : टी-20 विश्वचषक कव्हर करू इच्छिणाऱ्या बांगलादेशातील माध्यमकर्मींसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मान्यता प्रक्रिया पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आयोजित केलेल्या या स्पर्धेतून बांगलादेशला वगळण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे स्थळ बदलण्याची मागणी केली होती, परंतु त्यावर कोणतीही अनुकूल कारवाई झाली नाही. यानंतर आयसीसीने बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला स्पर्धेत समाविष्ट केले होते.
'मान्यतेसाठी आलेल्या अर्जांची संख्या आणि सामन्यांच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे फेररचना केली जात आहे. त्यानुसार नवीन यादी तयार केली जाईल,' असे आयसीसीच्या सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने वृत्त दिले आहे. सुमारे ९० पत्रकारांनी माध्यम मान्यतेसाठी अर्ज केला असून, बांगलादेश सहभागी झाला असता तरी इतक्या लोकांना परवानगी देणे शक्य नाही, असेही आयसीसीच्या सूत्रांनी सांगितले.
''चाळीसहून अधिक पत्रकारांना परवानगी देता येणार नाही. क्रिकेट बोर्डाच्या शिफारशीनुसार आयसीसी अर्जांवर निर्णय घेते,'' असे आयसीसीच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
टी-20 विश्वचषक कव्हर करण्यासाठीचे अर्ज आयसीसीने नाकारल्याचा आरोप करत बांगलादेशातील पत्रकारांनी निषेध नोंदवला होता. बांगलादेश १९९९ पासून विश्वचषकाचा भाग आहे. यापूर्वीच्या विश्वचषकांचे वार्तांकन केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांचे अर्जही नाकारण्यात आल्याचा आरोप आहे. आयसीसीने याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही, अशी टीकाही पत्रकारांनी केली आहे.
'इंग्लंडने आयोजित केलेल्या २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेश खेळला नव्हता. तरीही बांगलादेशातील पत्रकारांनी त्या स्पर्धेचे वार्तांकन केले होते. फिफा विश्वचषकाच्या बाबतीतही असेच घडले. पण, यावेळी मात्र परवानगी नाकारण्यात आली. बांगलादेश खेळत नसला तरी पत्रकारांशी असा दृष्टिकोन का ठेवला जात आहे,' अशी प्रतिक्रिया बांगलादेशी पत्रकार नाझमस शकीब यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशी पत्रकारांना मान्यतेसाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. प्रत्येक अर्जाची कसून तपासणी केल्यानंतरच परवानगी दिली जाईल.