
Rohit Sharma Virat Kohli Take Break : कसोटीतील व्हाईटवॉशनंतर एकदिवसीय मालिकेतील विजय भारतासाठी मोठा दिलासा देणारा आहे. टीम इंडियाने फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर मात केली. या फलंदाजीचे नेतृत्व केले ते विंटेज रो-को जोडीने. रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय फलंदाजीसाठी किती महत्त्वाचे आहेत, हे या एकदिवसीय मालिकेतून स्पष्ट झाले. कसोटीतील व्हाईटवॉशनंतर रो-को जोडीच्या आगमनाने भारतीय फलंदाजी पुन्हा बहरली.
संथ सुरुवात, नंतर संघर्ष आणि मग जोरदार फटकेबाजी, सगळीकडे फक्त सीनिअर्सचाच शो होता. कसोटीतील चार डावांमध्ये भारताची धावसंख्या फक्त एकदाच २०० पार गेली होती. एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्या दोन सामन्यांत टीम इंडियाने ३०० धावांचा टप्पा ओलांडला. तिसऱ्या सामन्यात ४० षटकांतच २७० धावा केल्या. तिन्ही सामन्यांमध्ये रो-को जोडीपैकी एकाने खिंड लढवली. कोहलीने तीन सामन्यांत ३०२ धावा करत मालिकावीराचा किताब पटकावला. ११७ च्या स्ट्राइक रेटने १२ षटकार आणि २४ चौकार मारले. यात दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 'मॅन ऑफ द सिरीज' पुरस्कार जिंकणारा खेळाडू म्हणून कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. रोहितने १४६ धावा केल्या. हिटमॅनने २ अर्धशतकेही झळकावली. 'फॉर्म तात्पुरता असतो, पण क्लास कायमस्वरूपी असतो' हेच जणू या रो-को जोडीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून सिद्ध केले. कसोटीतील पराभवानंतर एकदिवसीय मालिकेतील भारताचा बदललेला खेळ पाहून चाहते आनंदित झाले आहेत.
मालिकेची सुरुवात रो-को जोडीच्या फॉर्मवरील शंकेने झाली होती, पण मालिका संपताना संघात इतरही समस्या असल्याची आठवण करून दिली आहे. आता भारतीय संघ नवीन वर्षात न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळेल. तोपर्यंत रो-को शोला तात्पुरता ब्रेक आहे. दरम्यान, हे दोघेही विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याची शक्यता आहे.