Pakistan Beats India By 191 Runs To Win U19 Asia Cup : १९ वर्षांखालील आशिया कप क्रिकेटचे विजेतेपद पाकिस्तानने पटकावले आहे. भारताचा १९१ धावांनी पराभव करून पाकिस्तानने हे विजेतेपद मिळवले. हे त्यांचे दुसरे विजेतेपद आहे. २०१२ मध्ये भारत आणि पाकिस्तान संयुक्त विजेते होते. यावेळी दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने आठ गडी गमावून ३४७ धावा केल्या. ११३ चेंडूत १७२ धावा करणाऱ्या समीर मिन्हासने पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात भारतीय संघ २६.२ षटकांत १५६ धावांवर सर्वबाद झाला. १६ चेंडूत ३६ धावा करणारा दीपेश देवेंद्रन भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
वैभव सूर्यवंशी (२६), ॲरॉन जॉर्ज (१६), अभिज्ञान कुंडू (१३) आणि खिलन पटेल (१९) हे दुहेरी आकडा गाठणारे भारतीय खेळाडू होते. आयुष म्हात्रे (२), विहान मल्होत्रा (७), वेदांत त्रिवेदी (९), कनिष्क चौहान (९) आणि हेनिल पटेल (९) यांना चमक दाखवता आली नाही. शेवटी दीपेशने केलेल्या खेळीमुळे पराभवाचे अंतर कमी झाले. १६ चेंडूंचा सामना करताना त्याने दोन षटकार आणि सहा चौकार मारले. पाकिस्तानकडून अली रझाने चार बळी घेतले. मोहम्मद सैयाम, अब्दुल सुभान आणि हुजैफा अहसान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सलामीवीर समीर मिन्हासच्या ११३ चेंडूत १७२ धावांच्या स्फोटक शतकाच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली. ४४व्या षटकात ३०७-४ अशा मजबूत स्थितीत असलेल्या पाकिस्तानला समीर मिन्हासची विकेट गमावल्यानंतर धक्का बसला. मिन्हास बाद झाल्यानंतर भारताने एकापाठोपाठ एक बळी घेत पाकिस्तानला रोखले. एकेकाळी ३७५ धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत असताना पाकिस्तानचा डाव ३५० धावांच्या आत रोखण्यात भारताला यश आले. मिन्हासने नऊ षटकार आणि १७ चौकार मारले. भारताकडून दीपेश देवेंद्रनने तीन बळी घेतले, तर खिलन पटेल आणि हेनिल पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.