Indian cricketer Virat Kohli : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातही शून्यावर बाद होऊन विराट कोहलीने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारतात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे खेळाडू कोण आहेत? चला पाहूया.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही विराट कोहलीने निराशा केली. ॲडलेड वनडेमध्ये विराट कोहली पुन्हा एकदा एकही धाव न काढता बाद झाला. पर्थमधील पहिल्या वनडेत शून्यावर बाद झालेला विराट कोहली दुसऱ्या सामन्यातही खाते न उघडताच तंबूत परतला.
25
विराट कोहली पुन्हा शून्यावर बाद
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहली, चार चेंडू खेळल्यानंतर झेवियर बार्टलेटच्या गोलंदाजीवर पायचीत (LBW) होऊन तंबूत परतला. कोहलीच्या वनडे कारकिर्दीत सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ॲडलेड ओव्हल हे कोहलीचे आवडते मैदान आहे. त्याने येथे दोन वनडे शतके झळकावली आहेत.
35
ही कोहलीची शेवटची वनडे मालिका आहे का?
त्याने 2015 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 107 आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 104 धावा केल्या होत्या. पण यावेळी, त्याच मैदानावर तो शून्यावर बाद झाला. कोहली लवकर बाद झाल्याने चाहते निराश झाले. ही मालिका त्याची शेवटची वनडे मालिका असू शकते, अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.
वनडे सामन्यांमध्ये विराट कोहली 18व्यांदा शून्यावर बाद झाला आहे. भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर (20 वेळा) आणि जवागल श्रीनाथ (19 वेळा) यांच्यानंतर, कोहली आता युवराज सिंग आणि अनिल कुंबळे यांच्यासोबत 18 वेळा शून्यावर बाद झालेल्यांच्या यादीत सामील झाला आहे.
म्हणजेच, सचिन तेंडुलकर 463 सामन्यांमध्ये 20 वेळा, जवागल श्रीनाथ 229 सामन्यांमध्ये 19 वेळा, अनिल कुंबळे 269 सामन्यांमध्ये 18 वेळा, युवराज सिंग 301 सामन्यांमध्ये 18 वेळा आणि विराट कोहली 304 सामन्यांमध्ये 18 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
55
जगात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद कोण?
जागतिक स्तरावर वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. तो 445 वनडे सामन्यांमध्ये 34 वेळा शून्यावर बाद झाला. त्याच्यानंतर पाकिस्तानचा स्टार खेळाडू शाहिद आफ्रिदी 398 वनडे सामन्यांमध्ये 30 वेळा शून्यावर बाद झाला आहे.