U19 World Cup 2026 : हरारे येथे झालेल्या अंडर-19 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करून सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. वैभव सूर्यवंशीने 175 धावा करत विक्रम रचला.
युवा भारताने मोडला विश्वविक्रम, सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला
युवा भारताने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. झिम्बाब्वेमधील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या अंडर-19 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने विक्रमी सहाव्यांदा अंडर-19 विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे. प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या तुफानी खेळीमुळे टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली आणि त्यानंतर गोलंदाजीतही चमकदार कामगिरी करत इंग्लंडला रोखले.
25
वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारताला सलामीवीर वैभव सूर्यवंशीने धमाकेदार सुरुवात करून दिली. त्याने फक्त 80 चेंडूत 175 धावा करत इंग्लंडच्या गोलंदाजांना जेरीस आणले. त्याच्या खेळीत 15 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश होता. अंडर-19 विश्वचषक अंतिम सामन्याच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. वैभवने 2012 मध्ये उन्मुक्त चंदने केलेला 111 धावांचा विक्रम मोडला. वैभव आणि आयुषने दुसऱ्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी करून टीम इंडियाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
35
आयसीसी फायनलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या
भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 411 धावा केल्या. पुरुषांच्या 50 षटकांच्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 2003 च्या विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध केलेला 359/2 धावांचा विक्रम होता. भारताकडून आयुष (53), अभिज्ञान कुंडू (40), आणि कनिष्क चौहान (37 नाबाद) यांनी महत्त्वपूर्ण धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये कनिष्कच्या फटकेबाजीमुळे भारताने 400 धावांचा टप्पा ओलांडला.
412 धावांच्या अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने नियमित अंतराने विकेट गमावल्या. केवळ 100 धावांवर 2 गडी गमावल्यानंतर, एका टप्प्यावर संघाने 183 धावांवर 7 गडी गमावले आणि संघ अडचणीत सापडला. तथापि, कालेब फाल्कनरने एकहाती झुंज देत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने जेम्स मिंटोसोबत आठव्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. मात्र, 40.2 षटकांत 311 धावांवर इंग्लंडचा डाव संपुष्टात आला आणि भारताने 100 धावांनी विजय मिळवला.
55
भारताची विजयी परंपरा
या स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताने अंतिम सामन्यातही तोच जोर कायम ठेवला. 2000, 2008, 2012, 2018, 2022 नंतर आता 2026 मध्ये सहाव्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. यापूर्वी 2022 च्या अंतिम सामन्यातही भारताने इंग्लंडला हरवून विजेतेपद पटकावले होते. इंग्लंड संघाने आतापर्यंत फक्त एकदाच (1998 मध्ये) अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. ताज्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करून इंग्लंडच्या आशांवर पाणी फेरले.