
Jasprit Bumrah vs Sahibzada Farhan: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप २०२५ चा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ केवळ १४६ धावांवर गारद झाला आहे. या हाय व्होल्टेज सामन्यात पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर वातावरण तापले आहे. पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान आणि टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात मोठा वाद पाहायला मिळाला आहे. फरहानने बुमराहच्या एका चेंडूवर जबरदस्त षटकार ठोकल्यानंतर दोघांमध्ये हा प्रकार घडला. त्यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांना काहीतरी बोलताना दिसले.
नाणेफेक जिंकून सूर्यकुमार यादवने पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. सलामीवीर साहिबजादा फरहानने आक्रमक शैलीत फलंदाजीला सुरुवात केली. त्याने जसप्रीत बुमराहवर हल्ला चढवत धावा काढायला सुरुवात केली. इतकेच नाही तर त्याने एक चेंडू सीमारेषेबाहेर षटकारासाठीही पाठवला. यानंतर दोन्ही खेळाडूंमधील वातावरण तापले आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दोघांमध्ये नजरेनेच वाद सुरू झाला. त्यानंतर संपूर्ण स्टेडियममधील वातावरण तापले. मात्र, प्रकरण जास्त वाढण्याआधीच दोघेही एकमेकांपासून दूर झाले.
आशिया कप २०२५ मध्ये साहिबजादा फरहानची बॅट तळपली आहे. विशेषतः जसप्रीत बुमराहविरुद्ध त्याने आक्रमक पवित्रा घेत धावा केल्या आहेत. बुमराहविरुद्ध ३४ चेंडूत फरहानने ५१ धावा केल्या आहेत, ज्यात ६ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. तर, बुमराह या फलंदाजाला बाद करण्यात अपयशी ठरला आहे. फरहान हा जागतिक क्रिकेटमधील एकमेव फलंदाज आहे ज्याने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात बुमराहविरुद्ध तीन षटकार ठोकले आहेत.
भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यातही फरहानची बॅट तळपली. त्याने ३८ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १५०.०० होता. मात्र, तो आपली खेळी जास्त लांबवू शकला नाही आणि वरुण चक्रवर्तीच्या एका शानदार चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. तो बाद झाल्यानंतर संपूर्ण पाकिस्तान संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. एकेकाळी ८४/१ अशी धावसंख्या असलेला पाकिस्तानचा संघ १९.१ षटकांत केवळ १४६ धावांवर गडगडला.