
या मेळाव्याकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करतील आणि आगामी काळातील पक्षाची दिशा स्पष्ट करतील.
मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना, हा मेळावा ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांचे भाषण केवळ राज्यातील सत्ताधारी 'खोके' सरकारवर टीका करण्यापुरते मर्यादित राहणार नसून, ते राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे विषय, तसेच महाराष्ट्रातील ज्वलंत समस्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडतील अशी शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा आणि शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा दसरा मेळावा असेल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठे लक्ष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार असणार आहे, यात शंका नाही. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे हे पुन्हा एकदा 'गद्दारांना' धडा शिकवण्याचा आणि शिवसेनेत फूट पाडल्याबद्दल जनतेसमोर सत्य मांडण्याचा निर्धार करतील.
'खोके' सरकारची लक्तरे: राज्याच्या विविध विकासकामांमध्ये कथित भ्रष्टाचार आणि मुंबई महापालिकेत सुरू असलेल्या कामांची चौकशी या मुद्द्यांवरून ते शिंदे गटाला घेरण्याची शक्यता आहे. 'खोके' या शब्दाचा वापर करत ते पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा मुद्दा केंद्रस्थानी आणतील.
न्यायव्यवस्थेवर भाष्य: आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लांबल्याबद्दल ते न्यायव्यवस्थेवर मार्मिक भाष्य करण्याची शक्यता आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट कसे लढत आहे, हे ते पुन्हा एकदा ठामपणे मांडतील.
पक्ष प्रवेशः एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेना फोडण्याचा धडाका लावला आहे. यावरही जोरदार टीका होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा रंगली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे या संवेदनशील विषयावर प्रथमच स्पष्ट आणि निर्णायक भाष्य करतील अशी अटकळ आहे.
हिंदुत्व आणि मराठी एकजूट: राज ठाकरे यांनी नुकताच हिंदुत्वाचा मुद्दा अधिक जोरकसपणे मांडण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचा उल्लेख करत, भविष्यातील कोणत्याही राजकीय निर्णयाचा आधार 'मराठी अस्मिता' आणि 'हिंदुत्व' हेच असतील हे स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
'गरजेनुसार युती' की 'धोरणात्मक एकजूट'?: ते मनसेसोबतच्या संभाव्य युतीचे दरवाजे उघडे ठेवतात की, केवळ आगामी निवडणुकांमध्ये 'हिंदुत्वाच्या मत विभाजना'चा धोका टाळण्यासाठी ते सूचक विधान करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने, मराठी मतांचे विभाजन थांबवणे हा त्यांचा मुख्य उद्देश असू शकतो.
विशेष म्हणजे यंदाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास कार्यकर्त्यांना मोठा संदेश जाईल.
नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान घडलेल्या एका वादग्रस्त घटनेवरून उद्धव ठाकरे केंद्र सरकारवर टीका करण्याची शक्यता आहे.
राजकारण विरुद्ध राष्ट्रप्रेम: क्रिकेटच्या मैदानावर भारताच्या जवानांचा कथित अपमान झाल्याच्या मुद्द्याला ते हात घालू शकतात. राष्ट्रवादाचा मुद्दा सातत्याने मांडणाऱ्या भाजपला या विषयावरून घेरण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. खेळ आणि राजकारण एकत्र आणण्यावर भाजप टीका करत असताना, स्वतः भाजप सरकार राष्ट्रीय भावना जपण्यात कमी पडल्याचे चित्र ते उभे करतील.
काश्मिरी विद्यार्थ्यांचा मुद्दा: या सामन्याच्या अनुषंगाने, त्यांनी काश्मीरमधील स्थानिक राजकीय परिस्थिती आणि देशप्रेमाच्या व्याख्यांवर भाष्य केल्यास आश्चर्य वाटायला नको.
महाराष्ट्र सध्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने ग्रासलेला आहे, विशेषतः मराठवाड्यात 'ओला दुष्काळ'सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या संवेदनशील मुद्द्यावर ठाकरे सरकारला जाब विचारतील.
शेतकऱ्यांचा कैवारी: उद्धव ठाकरे हे सरकारला 'खोके' मोजण्यात वेळ न घालवता, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करतील. कोरडवाहू शेतकरी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बळीराजासाठी भरीव मदतीची घोषणा करण्याची मागणी ते करू शकतात.
सरकारची उदासीनता: प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आणि पंचनाम्यांमध्ये होणाऱ्या दिरंगाईवर ते तीव्र नाराजी व्यक्त करण्याची शक्यता आहे.
राज्यातील सत्ताधारी पक्षाने सुरू केलेल्या 'लाडकी बहिण योजना' या महत्त्वाकांक्षी योजनेवर उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील.
योजनेमागचा हेतू: या योजनेचे श्रेय घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, परंतु ठाकरे हे योजना अंमलबजावणीतील त्रुटी आणि महिलांच्या खऱ्या गरजा यांवर बोट ठेवतील.
सवलतीऐवजी संधी: महिलांना मोफत सवलती देण्याऐवजी, त्यांना शिक्षण, नोकरी आणि उद्योगाच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील, यावर त्यांचे लक्ष असेल. महिलांना 'लाडकी' न म्हणता 'शक्ती' म्हणून सन्मान देण्याची भूमिका ते मांडण्याची शक्यता आहे.
बदलते नियमः लाडकी बहिण योजनेचे दिवसागणिक नियम बदलत आहेत. त्यामुळे योजना राबवायची असेल तर सन्मानाने राबवा किंवा पैसे नाहीत असे सांगा, असा रोखठोक सवाल ठाकरे करतील.
लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर उद्धव ठाकरे आवाज उठवण्याची शक्यता आहे.
पर्यावरण आणि लोकशाही: वांगचुक यांचे आंदोलन हे पर्यावरणाचे संरक्षण आणि लडाखच्या स्थानिक संस्कृतीसाठी आहे. राष्ट्रीय स्तरावर संवेदनशील असलेल्या या मुद्द्याला हात घालून ठाकरे हे स्वतःला राष्ट्रीय मुद्द्यांवर बोलणारे आणि लोकशाही मूल्यांचे समर्थक म्हणून सिद्ध करू शकतील.
स्थानिक लोकांसाठी आवाज: भाजप-शासित केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना, ते स्थानिक जनतेच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या वांगचुक यांना समर्थन देण्याची घोषणा करू शकतात.