
मुंबई: दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीनंतरचा हा पहिलाच मोठा मेळावा असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेकडे होते. राज ठाकरेंनी आपल्या पहाडी आवाजात केंद्र सरकार, वाढते कर्ज आणि ढासळत्या शहरांच्या अवस्थेवर बोट ठेवत अनेक खळबळजनक विधानं केली.
राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात आंतरराष्ट्रीय राजकारणाने केली. ते म्हणाले, "काश्मीरच्या मुद्द्यावर इराणने नेहमीच भारताची पाठराखण केली. आपल्याला स्वस्त दरात तेल देणाऱ्या इराणला मोदींनी साथ द्यायला हवी होती. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर भारताने साधे निषेधाचे शब्दही उच्चारले नाहीत, हे दुर्दैवी आहे."
"आज देशाला इन्स्टाग्रामच्या करमणुकीत अडकवून ठेवलंय. डान्सबार बंद झाले आणि इन्स्टाग्राम सुरू झाले," असा टोला त्यांनी लगावला. लोकांनी रस्त्यावर उतरून राग व्यक्त करू नये, म्हणूनच सोशल मीडिया अशा प्रकारे डिझाइन केल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यावरील वाढत्या कर्जावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. "पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना २ लाख कोटींचं कर्ज होतं, जे आता ११ लाख कोटींवर पोहोचलंय. पिझ्झा १० मिनिटांत येतो, पण माणसाला १० मिनिटांत कुठेच पोहोचता येत नाही," अशा शब्दांत त्यांनी वाहतूक कोंडीवर टीका केली.
कोस्टल रोडच्या कौतुकावरून त्यांनी मुंबईकरांना सावध केले. "हा रस्ता तुमच्यासाठी नाही, तर मोठ्या बिल्डरांसाठी आणि बाहेरच्या लोकांसाठी आहे. तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आणि इतरांना आत आणण्यासाठी ही आखणी आहे," असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
राज्यातून मुले बेपत्ता होण्याच्या आकडेवारीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. केवळ मुंबई आणि नवी मुंबईतून शेकडो मुले बेपत्ता होत असून, एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार दरवर्षी महाराष्ट्रात ५ हजार मुले गायब होतात, ही अतिशय गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दल बोलताना राज म्हणाले, "प्रबोधनकार कधीही ब्राह्मण विरोधी नव्हते. ते केवळ धर्माच्या नावाने होणाऱ्या पिळवणुकीच्या आणि चुकीच्या रुढी-परंपरांच्या विरोधात होते."
राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या विकासासाठी लोकांच्या कल्पना जाणून घेण्यासाठी 'Maharashtra Next' ही नवी वेबसाईट लाँच केली. यामध्ये २७ विषयांवर तज्ज्ञांची समिती काम करणार असून, लोकांच्या चांगल्या कल्पना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम मनसे करणार आहे.