
Navi Mumbai International Airport : नाताळच्या शुभमुहूर्तावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आज गाठण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी अखेर या विमानतळावरून पहिल्या व्यावसायिक विमानोड्डाणास सुरुवात झाली. सकाळी 8.40 वाजता हैदराबादसाठी झेपावलेल्या विमानासह नवी मुंबई विमानतळाने प्रत्यक्ष प्रवासी सेवेत प्रवेश केला असून, अडीच महिन्यांपूर्वी उद्घाटन झाल्यानंतरची प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने सकाळी 8.40 वाजता हैदराबादसाठी पहिले उड्डाण केले. याआधी सकाळी 8 वाजता इंडिगोचे बंगळुरूहून येणारे पहिले विमान या विमानतळावर उतरले. पहिल्या दिवशी एकूण 30 विमानोड्डाणे होणार असून, हा क्षण साक्षीदार होण्यासाठी प्रवासी आणि विमानतळ कर्मचारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत.
पहिल्याच दिवशी सुमारे चार हजार प्रवासी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणार आहेत. नवी मुंबई ते गोवा, कोची, बेंगळुरू आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. इंडिगोसोबतच अकासा एअर, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि स्टार एअर या विमान कंपन्यांची विमानेही पहिल्या दिवशी सेवेत असणार आहेत.
पहिल्या दिवशी प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी विमानतळ प्रशासनाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विमानतळावर तसेच विमानप्रवासादरम्यान प्रवाशांना भेटवस्तू आणि बक्षिसे दिली जाणार आहेत. अदानी विमानतळ समूहाचे संचालक जीत अदानी यांनी सांगितले की, विमानतळ व्यवस्थापनासोबतच काही विमान कंपन्यांनीही प्रवाशांसाठी विशेष योजना आखल्या असून, हा पहिला प्रवास प्रवाशांसाठी सुखद धक्का देणारा ठरेल.
दरम्यान, नवी मुंबईतून विमानतळाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांची डागडुजी आणि साफसफाई करण्यात आली असून, विमानतळ परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. देशातील ग्रीनफिल्ड विमानतळ असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कमळाच्या आकाराचे आकर्षक डिझाइन विशेष लक्ष वेधून घेत आहे. विमानतळाच्या आतील रचना अत्याधुनिक असून, त्यात महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख ठळकपणे साकारण्यात आली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिला प्रवास प्रत्येक प्रवाशाच्या लक्षात राहावा, यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. विमानतळाच्या पाच वेगवेगळ्या ठिकाणी प्रवाशांना आश्चर्यचकित करणाऱ्या उपक्रमांची आखणी करण्यात आली असून, या ऐतिहासिक प्रवासादरम्यान प्रवाशांना वेगवेगळ्या स्वरूपातील भेटवस्तू आणि बक्षिसे दिली जाणार आहेत.