Mumbai Water Metro: राज्य सरकारने मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोचीच्या धर्तीवर वॉटर मेट्रो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला, ज्यामुळे समुद्रावरून प्रवास शक्य होईल.
मुंबई: गर्दीने फुललेल्या मुंबईत प्रवास हा दररोजचा संघर्ष झाला आहे. मात्र आता मुंबईकरांना या वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे! राज्य सरकारने मुंबईत “वॉटर मेट्रो” (जलमेट्रो) सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. हा प्रकल्प साकार झाल्यास मुंबईतील प्रवास केवळ रस्त्यावरच नव्हे, तर समुद्रावरूनही शक्य होईल. महाराष्ट्र सागरी मंडळाने या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार केला असून, कोची शिपयार्ड लिमिटेडकडून याचा अभ्यास सुरू आहे. याचबरोबर ही सेवा थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत नेण्याचा विचारही सुरु आहे.
25
कोचीच्या धर्तीवर मुंबईत जलमेट्रो सेवा!
इंडियन मर्चंट चेंबरच्या एका कार्यक्रमात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी ही माहिती दिली. त्यावेळी त्या म्हणाल्या, “महाराष्ट्र सागरी मंडळाने जलमेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला आहे. कोचीमध्ये या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने, कोची शिपयार्डकडून मुंबईसाठी व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.” या जलमेट्रो प्रकल्पामुळे वाहतुकीवरील ताण कमी होईल, प्रदूषण घटेल आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास भिडे यांनी व्यक्त केला.
35
भुयारी मेट्रोमध्ये नेटवर्कची समस्या संपणार!
मुंबईकरांना आणखी एक चांगली बातमी भुयारी मेट्रोमध्ये मोबाईल नेटवर्क न मिळण्याची समस्या लवकरच संपणार आहे. सर्व मेट्रो मार्गांवर 5G नेटवर्क सेवा सुरू करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांशी चर्चा सुरू असून, BSNLलाही या प्रक्रियेत सामील करण्यात आले आहे. तसेच सध्या तिकिट खिडकी भागात उपलब्ध असलेली Wi-Fi सुविधा लवकरच मेट्रो फलाटांवरदेखील सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास अनुभव मिळणार आहे.
अश्विनी भिडे यांनी पुढे सांगितले की, मेट्रो स्थानकांहून शहरातील इतर भागांमध्ये प्रवास सुलभ व्हावा यासाठी बेस्ट बससेवा जोडण्याचे नियोजन सुरू आहे. सध्या बेस्टकडे 2,500 बस आहेत, परंतु मुंबईसाठी किमान 10,000 बसांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लवकरच बेस्टच्या ताफ्यात मोठी वाढ होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
55
मुंबईसाठी वाहतुकीचा नवा अध्याय
जलमेट्रो प्रकल्प यशस्वी झाला तर मुंबईतील प्रवाशांना समुद्रमार्गे वेगवान, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा अनुभव मिळेल. ही सेवा नवी मुंबई विमानतळाशी जोडली गेल्यास, शहरातील ट्रॅफिकचा ताण लक्षणीय प्रमाणात कमी होईल आणि मुंबईच्या विकासकथेचा एक नवा अध्याय लिहिला जाईल.