Published : Jul 21, 2025, 08:29 AM ISTUpdated : Jul 21, 2025, 08:51 AM IST
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीत पावसाने चांगलीच बॅटिंग सुरू ठेवली आहे. मागच्या काही दिवसांपासून ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावलीय.आज, २१ जुलै, सोमवारचा पावसाचा अंदाज वाचा.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस कोसळत आहे. आज, २१ जुलै, या दिवशीही या भागांमध्ये पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये हलक्याशा सरींचं प्रमाण कमी झालं असलं तरी, दमट हवामान आणि वाढलेला उकाडा नागरिकांना त्रस्त करत आहे. ढगाळ वातावरणामुळे ऊन-पावसाचा लपंडाव सुरू आहे.
25
दुपारनंतर वाढणार पावसाचा जोर
मुंबई शहर आणि उपनगरात काल रविवारी पावसाने जबरदस्त हजेरी लावली होती. आज सकाळपासूनही आकाश पूर्ण ढगांनी भरलेलं असून, दुपारनंतर पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हवामान अधिकच दमट वाटत आहे. आज मुंबईत कमाल तापमान सुमारे ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी यलो अलर्ट देखील दिला आहे.
35
ठाणे आणि नवी मुंबईतील स्थिती
ठाणे आणि नवी मुंबईत काल संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. आजही या भागांमध्ये हलक्याशा ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, काही भागांत रिमझिम पाऊस सुरू आहे. ठाणे आणि नवी मुंबई परिसरात कमाल तापमान सुमारे ३० अंश, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस आहे. या भागांनाही यलो अलर्ट दिला गेला आहे.
पालघर जिल्ह्यात मात्र आज सकाळपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. काही भागात हलक्याशा सरी पडल्यात, पण जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. ढगाळ वातावरण असून, दमट हवामानामुळे ग्रामीण भागात उकाडा अधिक जाणवत आहे. आज पालघरमध्ये कमाल तापमान २९ अंश, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतकं राहील.
55
कोकणातील स्थिती
कोकणच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसांपासून जोरदार पावसाचा अनुभव आला आहे. आजही या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ढगाळ वातावरण आणि दमट हवामान असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. समुद्रकिनाऱ्यालगत वाऱ्याचा जोर आणि दमटता अधिक आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाताना हवामान खात्याच्या सूचनांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे.